‘समृद्धी’ विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा
By Admin | Updated: March 30, 2017 23:28 IST2017-03-30T23:28:00+5:302017-03-30T23:28:19+5:30
सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने येथील भव्य मोर्चा काढण्यात आला.

‘समृद्धी’ विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा
सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने येथील भव्य मोर्चा काढण्यात आला. नागपूर-मुंबई महामार्गासाठी करण्यात येणारी मोजणी त्वरित थांबविण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी महेश पाटील व तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना देण्यात आले.
गुरुवारी सकाळी बसस्थानक परिसरात समृद्धी महामार्गामुळे बाधीत होणारे शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. हातात फलक घेऊन शासनविरोधी घोषणा देत बसस्थानकापासून मोर्चाला प्रारंभ झाला. गावठा, नेहरू चौक, गणेशपेठ, शिवाजी चौक, वावीवेसमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चा अडवला. ठरावीक प्रतिनिधींनाच निवेदन देण्यासाठी आत जाता येईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. त्यानंतर संतप्त मोर्चेकऱ्यांनी शासनविरोधी घोषणा देण्यासाठी प्रारंभ केला. त्यामुळे पोलिसांनी केवळ महिलांना तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सोडण्याचा निर्णय घेतला. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने उर्वरित आंदोलनकर्त्यांनाही तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सोडण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात छोटेखानी सभा पार पडली.
या सभेत मोर्चेकऱ्यांनी आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. शहापूर येथील बबन हारणे यांनी समृद्धी महामार्गाच्या धोरणावर शासनावर कडाडून टीका केली. समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या नव्हे तर लोकप्रतिनिधी व सनदी अधिकाऱ्यांच्या समृद्धीसाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. या महामार्गाच्या सर्व्हेचे काम मुख्यमंत्र्यांच्या भावाला दिल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक अधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी बेनामी माालमत्ता घेतल्या असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांनी आत्महत्त्या न करता कडाडून
विरोध करण्याचे आवाहन हारणे यांनी केले.
कोणत्या शेतकऱ्यांनी या महामार्गाची मागणी केली त्यांची नावे अगोदर जाहीर करा, अशी मागणी किसान सभेचे कार्याध्यक्ष राजू देसले यांनी केली. यावेळी अॅड. सुभाष हारक, अॅड. राजेंद्र घुमरे, नंदा पवार, कचरू डुकरे, एल.एम. डांगे यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात राजू देसले, बबन हारणे यांच्यासह शांताराम ढोकणे, राजेंद्र घुमरे, नामदेव शिंदे, कचरू डुकरे, सोमनाथ वाघ, के. एम.सांगळे, मच्छिंद्र चिने, नामदेव आरोटे, शहाजी पवार, केरू पवार, अंबादास वाजे, भास्कर गुंजाळ, शिवाजी चव्हाणके, नीलेश गुंजाळ, कृष्णा दराडे, आनंदा कोठुंगे, जालिंदर आढाव, नवनाथ ढोली, तानाजी तुपे, अॅड. दामोदर पाजीरे, चिंतामण वाघ, सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले
होते. (वार्ताहर)