शेतकऱ्यांचा हल्लाबोल
By Admin | Updated: September 13, 2016 00:25 IST2016-09-13T00:25:09+5:302016-09-13T00:25:19+5:30
पाटोदा : भारनियमनाच्या वेळेत बदल करण्याची मागणी

शेतकऱ्यांचा हल्लाबोल
पाटोदा : वीजपुरवठा आठ दिवस दिवसा बंद राहिला तर शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या कांद्यास पाणी केव्हा भरायचे. शेतातील उभी पिके पाण्यावाचून जळून चालल्याने शेतकऱ्यांनी काय करायचे, शेतकऱ्यांनी कांदा लागवड बंद करायचीच नाही का, असा सवाल उपस्थित करीत पंचायत समिती सदस्य रतन बोरणारे, भगवान ठोंबरे, साहेबराव अहेर, अण्णा दौंडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी येथील कार्यालयावर हल्लाबोल करत येथील सहाय्यक कनिष्ठ अभियंता महेंद्र मूळकर यांना निवेदन देत येत्या आठ दिवसात भारनियमनाच्या वेळेत बदल न केल्यास सोमवारी (दि. १९) कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.
येथील विद्युत वितरण कंपनी केंद्रामार्फत परिसरातील पाटोदा, पिंपरी, ठाणगाव, कानडी, विखरणी, शिरसगाव लौकी, निलखेडे, सोमठाण देश, आंबेगाव या गावांना वीजपुरवठा केला जातो; मात्र गेल्या काही दिवसांपासून वीज कंपनीने परिसरात भारनियमनांच्या वेळात बदल केल्याने शेतातील उभ्या पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके सुकू लागली आहे़