‘शेतकऱ्यांवरील कारवाई अन्यायकारक
By Admin | Updated: January 30, 2016 22:23 IST2016-01-30T22:10:51+5:302016-01-30T22:23:44+5:30
’येवला : पिण्याच्या नावाखाली शेतीला घरघर

‘शेतकऱ्यांवरील कारवाई अन्यायकारक
येवला : शेतीच्या पाण्यासाठी निर्माण केलेली धरणे आता पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित होऊ लागल्याने परिसरातील शेती व्यवसायाला घरघर लागली आहे. शेती जगविण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची चोरी करण्यास शासन भाग पाडत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने स्वतंत्र पाइपलाइनद्वारे व्यवस्था करावी, परंतु शेतकऱ्याला पाणीचोर ठरवून केली जाणारी कारवाई अन्यायकारक असल्याचे शेतकरी नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
हक्काचे पाणी शेतकऱ्याला मिळत नाही व लाखो रु पये खर्च करून पिके जळत आहेत. त्यामुळे शेतकरी पाणीचोरी करणारच ही परिस्थिती शेतकऱ्याला सहन न झाल्यास अखेर ताकदीच्या जोरावर पाणी घेतल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही. करंजवन १७०० दलघफू, पालखेड १५० दलघफू, ओझरखेड व वाघाड यामधील शेतीसाठी आरक्षित साठा एवढे सारे पाणी असताना एप्रिल व जूनमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन मिळणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी पाणी चोरले, अशी हाकाटी पिटली जात आहे. हे योग्य नाही. साठवण तलाव होण्याअगोदर १९९६ पूर्वीपासून या परिसरात शेती फुलविली जाते आहे. छोटे-मोठ्या बागाही उभ्या केल्या गेल्या; परंतु सध्या पिण्याच्या पाण्याची ओरड करून येथील शेतकऱ्यांच्या वीजपंपाचे कनेक्शन तोडणे, मोटारी जप्त करणे हा उद्योग अयोग्य असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. शेतपंपाचे वीज कनेक्शन तोडणे ही कृती असमर्थनीय असून, पाण्याचे महत्त्व अधोरेखित करून पाण्याचा भाव वाढविण्याची चर्चादेखील परिसरात आहे. हजार रुपये भावाचा डोंगळा पाच हजारांवर गेल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीशिंदे यांनी व्यक्त केली
आहे. (वार्ताहर)