शेतकरी समुपदेशन निव्वळ फार्स
By Admin | Updated: July 3, 2016 00:23 IST2016-07-03T00:22:15+5:302016-07-03T00:23:12+5:30
शेतकरी समुपदेशन निव्वळ फार्स

शेतकरी समुपदेशन निव्वळ फार्स
नाशिक : जिल्ह्यात वाढत्या शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना त्यापासून परावृत्त करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा फोल ठरला असून, शुक्रवारी बॅँकेचे कर्ज डोक्यावर घेऊन आत्महत्त्या करण्याच्या मन:स्थितीत असलेल्या तिघा शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपल्यावरील कर्जफेडीबाबत समुपदेशन करण्याची मागणी केली, परंतु बॅँकेच्या कर्जासंबंधीचा विषय अखत्यारित येत नसल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजनांचा आधार घेतला आहे. त्यात प्रामुख्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांचे गावोगावी मेळावे घेण्याबरोबरच त्यांचे समुपदेशन करून आत्महत्त्या करण्यापासून रोखणे याला प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले. एवढेच नव्हे तर कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्त्या न करता थेट आपल्याला भेटावे, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी केले होते.
पावसाळा सुरू होऊनही यंदा वरुणराजाने अजूनही आपली कृपादृष्टी न केल्याने शेतकऱ्यांची अडचण कायम असून, दुसरीकडे बॅँकांचा कर्जफेडीसाठी तगादा सुरू झाल्यामुळे शुक्रवारी अशा तगाद्याला कंटाळलेल्या तिघा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून समुपदेशन केंद्राचा शोध घेतला.
समुपदेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी या शेतकऱ्यांनी बॅँकेच्या कर्जाची कागदपत्रेही सोबत आणली होती, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात अशा प्रकारचे कोणतेही समुपदेशन केंद्र अस्तित्वात नसल्याचे पाहून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे दालन गाठले असता, जिल्हाधिकारीही कार्यालयात हजर नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना टंचाई शाखेत पाठविण्यात आले, परंतु तेथेही या शेतकऱ्यांची समजूत निघू शकलेली नाही. अखेर समुपदेशन न होताच कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी माघारी फिरणे पसंत केले. याचाच अर्थ जिल्हा प्रशासनाचा शेतकरी समुपदेशनाचा निव्वळ फार्स ठरला आहे.