कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:15 IST2021-01-23T04:15:29+5:302021-01-23T04:15:29+5:30
सुनील बाळू पगार(४२) यांची तळवाडे दिगर येथे पाच एकर शेती असून, घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी शेतीवर एचडीएफसी बँकेचे ...

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
सुनील बाळू पगार(४२) यांची तळवाडे दिगर येथे पाच एकर शेती असून, घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी शेतीवर एचडीएफसी बँकेचे व्याजासह २१ लाख तर डांगसौंदाणे येथील सप्तश्रृंगी महिला बँकेकडून ५ लाखाचे कर्ज घेतले होते, तसेच शेतीच्या भांडवलासाठी हातउसनवार केली होती. यातच मागील दोन वर्षांपासून भाजीपाला पिकातील खराब वातावरण व पिकून आले तर बाजारभाव नाही, अशा संकटांना तोंड देत शेतीचा गाडा ओढत होते. दरम्यान, सकाळी शेतातील टरबूज फवारणीसाठी ते शेतात गेले असता, शेतातील आंब्याच्या झाडास गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्याच दरम्यान फवारणीसाठी वडिलांना मदतीसाठी गेलेल्या त्यांच्या मुलाने सदर प्रकार पाहिला. स्थानिक ग्रामस्थांनी आत्महत्येची माहिती सटाणा पोलीस ठाण्यास कळविल्याने पंचनामा केला. सटाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पंकज सोनवणे व जयंतसिंग सोळंखे करीत आहेत. सुनील पगार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे.
फोटो - २२ सुनील पगार