घंटागाडी कामगारांची कुटुंबे रस्त्यावर
By Admin | Updated: September 4, 2014 00:44 IST2014-09-04T00:39:55+5:302014-09-04T00:44:27+5:30
घंटागाडी कामगारांची कुटुंबे रस्त्यावर

घंटागाडी कामगारांची कुटुंबे रस्त्यावर
नाशिक : घंटागाड्यांवर काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी रोजगाराचे साधन मिळावे, यासाठी या कामगारांची कुटुंबेच आज रस्त्यावर आली. भरपावसात राजीव गांधी भवनावर मोर्चा काढून त्यांनी सेवेत घेण्याची मागणी केली. दरम्यान, ठेकेदारी रद्द करून कामगारांना कायम केल्यास पालिकेची आर्थिक बचत कशी होईल, याची आर्थिक पडताळणी करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासन उपआयुक्तांना दिले आहेत. पालिकेच्या घंटागाड्या चालविण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारांमार्फत सुमारे साडेचारशे कामगार गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. सदरचे काम स्थायी स्वरूपाचे असल्याने त्यांना पालिकेच्या सेवेत कायम करावे, अशी मागणी असून त्यासंदर्भात कामगार उपआयुक्तांनी पालिकेला आदेशित केले आहेत. तरीही कार्यवाही होत नसल्याने श्रमिक सेवा संघाच्या नेतृत्वाखाली कामगार गेल्या १६ आॅगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी कामगारांनी त्यांच्या मुलाबाळांसह पालिकेच्या भालेकर हायस्कूल ते राजीव गांधी भवन असा मोर्चा काढला. त्यानंतर श्रमिक सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद रानडे, सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड, महादेव खुडे, संतोष जाधव, सुरेश लहानगे, अॅड. राजपाल राणा, अॅड. वायचळे, विजय बागुल यांनी उपआयुक्त विजय पगार यांची भेट घेतली आणि निवेदन दिले. तसेच मोर्चाला संबोधित केले. (प्रतिनिधी)