येवल्यात कांदा भावात घसरण
By Admin | Updated: April 14, 2016 23:09 IST2016-04-14T22:55:33+5:302016-04-14T23:09:24+5:30
दुष्काळात तेरावा : खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतातुर

येवल्यात कांदा भावात घसरण
येवला : बाजार समितीत कांद्याचे भाव ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल असून, गेल्या महिन्याभरापासून आवक वाढत असल्याने भाव आणखी १०० ते १५० रुपयांनी घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाणी नाही म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी ठेका पद्धतीने अन्य तालुक्यात कांदा लागवडीसाठी गेलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आता खर्च तर करून बसलो; परंतु भाव घसरत असल्याने हाती धुपाटणे घेण्याची वेळ आली आल्याची प्रतिक्रि या शेतकरी व्यक्त करीत आहेत.
कांद्याचे भाव घसरत असताना आता शेतकरी शासनाला जाब विचारू लागला आहे. कृषिमूल्य आयोगाची भाव ठरवण्याची
पद्धती कांद्याच्या बाबतीत का मूग गिळून बसते, असा सवाल आता विचारत आहेत. शेतकऱ्यांचा कांदा वाढला की, हाकाटी पिटली जाते; पण तोच कांदा उत्पादन खर्च फिटत नसताना शेतकऱ्यांना विकावा लागतो. याबाबत मात्र केंद्रशासन काहीच बोलत नाही. ही वस्तुस्थिती आहे. अच्छे दिन येण्यासाठी उचललेले पाऊल चुकले की काय? अशीदेखील विचारणा करू लागली आहे. येवला तालुका दुष्काळी असल्याने पाणी नाही म्हणून कांद्याचे पीक घेण्यासाठी तालुक्यातील शेतकरी, कोपरगाव, गंगापूर, वैजापूर, कन्नड, पैठण, शिरपूरसह अन्य ठिकाणी २५ ते ३० हजार रुपये ठेक्याने कांदा लागवड करण्यासाठी कुटुंबांसह गेले आहे. काही शेतकरी तिसरा वाटा पद्धतीने ही अन्य ठिकाणी कांदा पीक घेतले आहे. परंतु कांद्याचे भाव कमालीचे घसरल्याने आगीतून फुफाट्यात पडल्याची परिस्थिती शेतकऱ्याची झाली आहे. (वार्ताहर)