कर्ज भरूनही शेतकऱ्यांच्या डोक्यावर बोजा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:17+5:302021-09-02T04:29:17+5:30

मानोरी : वन टाइम सेटलमेंट केलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ व्हावी, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून येवला तालुका तहसीलदार ...

Even after repaying the loan, the burden remains on the heads of the farmers | कर्ज भरूनही शेतकऱ्यांच्या डोक्यावर बोजा कायम

कर्ज भरूनही शेतकऱ्यांच्या डोक्यावर बोजा कायम

मानोरी : वन टाइम सेटलमेंट केलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ व्हावी, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून येवला तालुका तहसीलदार प्रमोद हिले यांना देण्यात आले आहे. राज्य सरकारने दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट योजना लागू केलेली असताना अनेक शेतकऱ्यांनी या वन टाइम सेटलमेंट योजनेत सहभागी होऊन नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपले कर्ज भरलेले असताना देखील अद्यापही ही कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर या कर्जाच्या बोजाच्या नोंदी असल्याने इतर कोणत्याही बँका शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडून गेले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत एक रुपयादेखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक प्रमुख श्रावण देवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा तालुका अध्यक्ष मच्छिंद्र जाधव, अध्यक्ष किरण बारे, प्रभाकर गरूड आदी उपस्थित होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या कोणत्याही शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. लाखो रुपये खर्चून लावलेल्या टोमॅटोंना देखील कवडीमोल भाव मिळत असल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आपले टोमॅटो रस्त्यावर टाकून देत, तर कुठे जनावरांना चारा म्हणून खाऊ घालत आपला रोष व्यक्त केला आहे. सध्याच्या परिस्थितीत टोमॅटोचा विचार केला असता मिळणाऱ्या भावातून साधा उत्पादन खर्च देखील फिटत नसून गाडीभाडे खिशातून देण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली असून, दुसरीकडे उन्हाळ कांद्याच्या दरात देखील सातत्याने घसरण होत असून, भाववाढीच्या अपेक्षेने ठेवलेला कांदा चाळीतच सडू लागला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. (३० येवला ३) वन टाइम सेटलमेंट कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देताना येवला तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी.

Web Title: Even after repaying the loan, the burden remains on the heads of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.