अभियंत्यांना मिळणार ओळखचिन्ह
By Admin | Updated: July 14, 2014 00:29 IST2014-07-13T23:21:22+5:302014-07-14T00:29:30+5:30
अभियंत्यांना मिळणार ओळखचिन्ह

अभियंत्यांना मिळणार ओळखचिन्ह
कळवण : डॉक्टर, वकील, फार्मासिस्ट, पोलीस, सीए, या व्यवसायीकांना विशिष्ट ओळखचिन्ह आहे. परंतु अभियंत्यांसाठी मात्र नाही. अभियंत्यांसाठी ओळखचिन्ह मिळावे यासाठी येथील गौरव शिंपी, तुषार पाटील, कुणाल कोठावदे, सचिन शिरुडे यांनी ओळखचिन्ह (लोगो) तयार करून राज्य व केंद्र सरकारकडून मान्यता मिळावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला आहे. टोपे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
अभियंत्यांसाठी ओळखचिन्ह असावे, अशी संकल्पना कळवण येथील अभियंता विनीत मालपुरे यांना सुचली. त्यानंतर लोगो तयार करण्याचे काम सुरू झाले. गौरव शिंपी, तुषार पाटील, कुणाल कोठावदे, सागर मालपुरे, सचिन शिरुडे यांनी त्यासाठी परिश्रम घेतले. या शिष्टमंडळाने बनविलेल्या ओळखचिन्हाला राज्य व केंद्र सरकारकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. लवकरच अभियंत्यांचे स्वत:चे ओळखचिन्ह पहायला मिळेल. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांना शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाची प्रत पुढील कारवाईसाठी उच्च व तंत्रशिक्षण प्रधान सचिव यांच्याकडे पाठवण्यात आली आहे . याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनाही देण्यात आले आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार ए. टी. पवार यांनीही अभियंत्यांसाठी ओळखचिन्ह मिळावे यासाठी विनंती केली आहे. कळवण येथील विनीत देवीदास मालपुरे हा पुणे येथील जेएसपीएम संस्थेच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्ष माहिती तंत्रज्ञान विभागात शिक्षण घेत आहेत. (वार्ताहर)