म्हसरूळ ते आंबेडकरनगरपर्यंतची अतिक्रमणे जमीनदोस्त
By Admin | Updated: May 31, 2014 00:20 IST2014-05-31T00:14:57+5:302014-05-31T00:20:38+5:30
माजी प्रभाग सभापतींचेही अतिक्रमण काढले : किरकोळ वादाचे प्रसंग

म्हसरूळ ते आंबेडकरनगरपर्यंतची अतिक्रमणे जमीनदोस्त
माजी प्रभाग सभापतींचेही अतिक्रमण काढले : किरकोळ वादाचे प्रसंग
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने म्हसरूळ ते आंबडेकरनगरपर्यंतच्या रस्त्याच्या पूर्वेकडील बाधित होणारी अतिक्रमणे शुक्रवारी जमीनदोस्त केली़ या मोहिमेची कोणत्याही प्रकारची सूचना न दिल्याच्या कारणावरून अतिक्रमणधारकांनी अधिकार्यांसोबत किरकोळ वाद घातला़ या मोहिमेत पंचवटीच्या माजी प्रभाग सभापतींचे पूर्वीचे संपर्क कार्यालय तसेच घरासमोरील अतिक्रमणही जमीनदोस्त करण्यात आले़ रस्त्यावरील सुमारे दोनशे अतिक्रमणे हटविल्याने रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे़
दिंडोरीरोडवरील म्हसरूळ गावातील महापालिकेच्या कार्यालयापासूनच अतिक्रमणास सुरुवात होत होती़ आगामी सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून आरटीओ कॉर्नरपासून ते आरोग्य विज्ञान विद्यापीठापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील रुंदीकरणाचे काम जोराने सुरू असून, पश्चिमेकडील एका बाजूचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे, तर म्हसरूळ गावच्या रस्त्याच्या पूर्वेकडील अतिक्रमणे ही रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरत होती़ वडनगरजवळील भंगार मालाचे गुदाम व काही घरांनी तर रस्त्यापर्यंत अतिक्रमण केले होते़
मनपाचे सहायक आयुक्त एस़ डी़ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठ वाजेपासून या मोहिमेस सुरुवात झाली़ सर्वप्रथम म्हसरूळ येथील महापालिकेच्या घरपी भरणा कार्यालयाचे अतिक्रमित पत्रे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले़ यानंतर म्हसरूळ तलाठी कार्यालय, माया हॉटेल, पाण्याची टाकी, हॉटेल रोहिणी, रसवंतीगृह, माजी प्रभाग सभापतींचे पूर्वीचे संपर्क कार्यालय, म्हसरूळचे बसस्थानक, वडनगर ते आंबेडकरनगरपर्यंतची रस्त्यावरील अतिक्रमणे यावेळी जमीनदोस्त करण्यात आली़ हॉटेल रोहिणीजवळ अतिक्रमणे काढण्यावरून अतिक्रमण अधिकारी व पंचवटीचे माजी प्रभाग सभापती व नगरसेवक अशोक बुरुंगे यांच्यात किरकोळ वाद झाला़ येथे नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दर्शविली होती.
या अतिक्रमण मोहिमेसाठी विभागाचे चार ट्रक, एक जेसीबी, ६० कर्मचारी, अधिकारी, पुरुष व महिला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ या मोहिमेदरम्यान वडनगरजवळ काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती़ या ठिकाणचे अतिक्रमण हटविल्यानंतर लगेचच जेसीबीने रस्ता रुंदीकरणाचे कामही सुरू करण्यात येत होते़ (प्रतिनिधी)
बातमीला जोड आहे़