सिन्नर : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वीजतोड मोहिमेविरोधात तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत राज्य सरकार व विद्युत मंडळ यांना रिकामा हंडा भेट दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनादेखील रिकामा हंडा पाठविणार असल्याचे सांगितले. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मनेगाव येथे मंगळवारी सकाळी हंडा घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. मनेगावसह १६ गावांचा पाणीपुरवठा योजनेची वीज तोडल्याने सदर गावातील व परिसरातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्यायला पाणी नाही, शेतात पाणी नसल्याने पिके करपू लागली आहेत. वीज वितरणची वीजतोड मोहीम थांबवावी, वीजपुरवठा त्वरित चालू करावा. यासाठी वीज कनेक्शन जोडून व वीजतोड मोहीम थांबवून ग्रामीण भागातील जनतेला न्याय द्यावा, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------------