अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सिंहस्थाकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: November 26, 2015 00:04 IST2015-11-26T00:03:13+5:302015-11-26T00:04:22+5:30
कार्यकर्त्यांच्या भावना : भाविकांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार

अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सिंहस्थाकडे दुर्लक्ष
पंचवटी : दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील प्रमुख तीन शाहीस्नानाच्या पर्वण्या आटोपल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी केलेल्या सुखसुविधा काढून घेतल्याने प्रशासनाने एकप्रकारे सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगताच करून टाकली आहे. नाशिकला दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. साधारणपणे तेरा महिन्यांपर्यंत या सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व असले तरी प्रशासनाने केवळ प्रमुख तीनच पर्वण्यांना विशेष महत्त्व देऊन उर्वरित पर्वण्यांसाठी कोणतीही सुविधा केलेली नाही. कुंभमेळ्यासाठी पंचवीसशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असला तरी प्रशासनाने हा निधी केवळ पंचवीस दिवसांसाठीच वापरून एकप्रकारे उदासीनता दाखवून दिली आहे.
प्रमुख तीन पर्वण्या संपल्यानंतर वर्षभरात अनेक महत्त्वाच्या पर्वण्या असल्या तरी त्या पर्वण्यांचे नियोजन नाही अन् येणाऱ्या भाविकांची कशाप्रकारे सोय करायची याचे नियोजनही प्रशासनाकडे नसल्याने कुंभमेळ्याच्या कालावधीत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केवळ चमकोगिरी केली असाच आरोप नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरते शौचालय, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या होत्या; मात्र प्रमुख तीन पर्वण्या आटोपताच त्या काढून घेण्यात आल्या. आणखी शिवरात्री पर्वकाळ, वसंतपंचमी, अक्षयतृतीया या दिवशीही प्रमुख पर्वण्या आहेत, परंतु प्रशासनाने वर्षभराच्या प्रमुख पर्वण्यांची माहिती भाविकांपर्यंत पोहोचविलेली नाही. कुंभमेळ्याचा पर्वकाळ वर्षभराचा असल्याने भाविक त्यांच्या सोयीनुसार येतात; मात्र प्रशासनाने आगामी पर्वण्यांसाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही. कुंभमेळा हा केवळ साधू-महंत नाही तर भाविकांचाही आहे हे प्रशासनाने लक्षात घेणे गरजेचे आहे. (वार्ताहर)