निवडणूक मानधनापासून कर्मचारी अद्याप वंचित
By Admin | Updated: March 11, 2017 23:14 IST2017-03-11T23:13:42+5:302017-03-11T23:14:00+5:30
नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडलेल्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कर्तव्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

निवडणूक मानधनापासून कर्मचारी अद्याप वंचित
नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडलेल्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कर्तव्य बजावलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना महिना उलटूनही निवडणूक मानधन न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात असून, मानधन मिळण्याबाबत शासकीय यंत्रणेकडून कोणताही उलगडा होत नसल्याने पैसे मिळण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी ३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सुमारे १६० मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. एका मतदान केंद्रावर पाच कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना निवडणूक यंत्रणेने प्रामुख्याने शासकीय कर्मचाऱ्यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. मतदानाच्या आदल्या दिवशी या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर हजर राहावे लागले तसेच रात्रभर मतदान केंद्रावरच मुक्काम ठोकून दुसऱ्या दिवशी मतपेट्या जमा करेपर्यंत साधारणत: ४८ तास अविरत कामकाज करावे लागले. त्याचप्रमाणे मतमोजणीच्या दिवशीही वीस ते बावीस तास कामकाज करावे लागले. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलिसांचीही नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीचे काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात निवडणूक यंत्रणेकडून मानधन दिले जाते. पूर्वी मानधनाची रक्कम कर्मचाऱ्यांना कामकाज आटोपल्यानंतर तत्काळ रोख स्वरूपात अदा केली जात असली तरी, काळानुरूप आता त्यात बदल करण्यात आला असून, मानधनाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, त्यासाठी पदवीधर निवडणुकीसाठी नेमलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे बॅँक खाते व त्याचे आयएफसी कोड क्रमांक जमा करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक यंत्रणेने तीन वेळा बॅँक खाते क्रमांक तसेच एक वेळा पासबुकाची झेरॉक्स प्रत प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली व दोन दिवसांत प्रत्येकाच्या बॅँक खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले, परंतु निवडणूक प्रक्रिया पार पडून एका महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला, परंतु अद्यापही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे या रकमेबाबत शंका घेतली जात आहे. (प्रतिनिधी)