शहरात तातडीचे भारनियमन सुरू
By Admin | Updated: June 3, 2014 02:21 IST2014-06-02T01:49:14+5:302014-06-03T02:21:36+5:30
नाशिक : राज्यातील अनेक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड उद्भवल्याने राज्याच्या विजेत सुमारे तीन हजार मेगावॉटची तूट निर्माण झाल्यामुळे सर्वत्र तातडीचे भारनियमन लागू करण्यात आले आहे.

शहरात तातडीचे भारनियमन सुरू
नाशिक : राज्यातील अनेक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड उद्भवल्याने राज्याच्या विजेत सुमारे तीन हजार मेगावॉटची तूट निर्माण झाल्यामुळे सर्वत्र तातडीचे भारनियमन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातही तातडीचे भारनियमन करण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. उद्या सायंकाळपर्यंत वीजनिर्मिती पूर्ववत होण्याची शक्यता असल्याने उद्या म्हणजे सोमवारीही शहरात भारनियमन केले जाणार आहे. शहरातील ‘ए’ ते ‘डी’ पर्यंतच्या सर्व ग्राहकांना या भारनियमनाचा फटका बसला. दरम्यान, सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास परळी आणि इंडिया बुल्स वीजनिर्मिती केंद्रातील वीजनिर्मिती सुरळीत झाल्याने काहीअंशी दिलासा मिळाला आहे. राज्यात उष्णतेची लाट असताना, अचानक वीजनिर्मिती केंद्रेही बंद पडल्यामुळे राज्यभर तातडीचे भारनियमन करावे लागले. एकदम तीन हजार मेगावॉट विजेचा तुटवडा झाल्यामुळे मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे राज्यभर तातडीचे भारनियमन करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार नाशिक शहरातही दुपारच्या सुमारास सक्तीचे भारनियमन करण्यात आले. दुपारी बारा वाजेनंतरही भारनियमन करण्यात आले. शहरातील सुमारे ९० टक्के भाग हा ‘ए’ गटात मोडत असल्याने शहरात सुमारे तीन तास पंधरा मिनिटे इतके भारनियमन करावे लागले. अचानक वीज गायब झाल्याने नेमके काय झाले याविषयी नागरिकांना कोणतीही माहिती नसल्याने त्यांनी याबाबत कॉल सेंटरकडे विचारणा केली; मात्र त्यांनाही याची पुरेसी माहिती नसल्याने गोंधळात अधिकच भर पडली. इतक्या मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नाशिक शहरात ‘ए’ ते ‘डी’ पर्यंतच्या ग्रुपमध्ये भारनियमन करण्यात आले. ग्रुप ‘बी’मध्ये तब्बल चार तास भारनियमन करण्यात आले. ग्रुप ‘सी’मध्ये चार तास ४५ मिनिटे, तर ग्रुप ‘डी’ मध्ये सुमारे साडेपाच तास इतक्या मोठ्या प्रमाणात भारनियमन करावे लागले. अद्यापही वीजनिर्मितीला अडचणी येत असल्याने उद्या सायंकाळपर्यंत शहरात भारनियमन होण्याची शक्यता महावितरणने वर्तविली आहे. दरम्यान, सायंकाळी परळी येथून २१०, तर इंडिया बुल्स येथून २४५ मेगावॉट विजेचे उत्पादन पूर्ववत झाले. दरम्यान, विजेची तूट मोठ्या प्रमाणात असल्याने राज्य सरकारने केंद्रीय ग्रीडमधून १००० मेगावॉट वीज घेण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)