शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी

By Admin | Updated: June 2, 2014 01:20 IST2014-06-01T01:49:08+5:302014-06-02T01:20:36+5:30

सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागात मार्चमध्ये गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अद्यापही शासनाची मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे.

Embarrassed farmers | शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी

शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी

सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागात मार्चमध्ये गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अद्यापही शासनाची मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. ज्या शेतकर्‍यांना मदत मिळाली ती तुटपुंजी असल्याने शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाकडून मिळालेल्या नुकसानभरपाईची रक्कम तालुकास्तरावर पाठविण्यात आली आहे. तथापि, अद्यापही अनेक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा झाली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही शेतकर्‍यांना ही रक्कम मिळाली असली तरी ती अत्यंत कमी असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. लाखोंचे नुकसान होऊनही पाच टक्के रक्कमही हाती लागू शकली नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. तालुक्यात मार्च महिन्याच्या आरंभीच जोरदार वादळीवार्‍यासह गारपिटीचा तडाखा बसल्याने कोट्यवधीची हानी झाली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन शासनाकडे तालुक्यातून साडेबारा कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तालुक्यातील गारपिटीने बाधित क्षेत्रातील ३६ गावांचा समावेश असून, त्यातील सुमारे साडेअकरा हजार गारपीटग्रस्त शेतकर्‍यांंसाठी अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर अदा करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात आले होते. त्यास दोन महिने उलटून गेले असतानाही अद्याप अनेक शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याने शेतकरी गावातील कामगार तलाठी, नाशिक जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये हेलपाटे घालून कंटाळले आहेत. तलाठी म्हणतात याद्या पाठविण्यात आल्या तर बँकेतील कर्मचारी म्हणतात अद्याप खात्यावर रक्कम जमा झाल्याचे दिसत नाही. यापूर्वी रक्कम बँक खात्यावर अदा कण्याची कार्यवाही ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी सांगितले होते. मात्र मे महिना संपला असतानाही शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. मे महिन्यात खरीप पूर्व मशागतींच्या कामांना प्रारंभ केला जातो. त्यापूर्वी अनुदानाची रक्कम मिळणे अपेक्षित आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तालुक्याच्या पूर्वभागातील सांगवी, सोमठाणे, दहिवाडी, धनगरवाडी, शिंदेवाडी, उज्जनी तर पश्चिम भागातील ठाणगाव, पाडळी, कोनांबे, सोनांबे, आदि गावांमध्ये वादळीवार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. त्यात द्राक्षासह डाळिंबाच्या बागा भुईसपाट झाल्या असून, कांदा वाफ्यातच सडून गेला. गहू, ज्वारी, हरभरा तसेच चारा पिकाची मका, गवत आदि पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊन कोट्यवधींची हानी झाली आहे. त्यानंतर तहसील व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडून संयुक्तरीत्या पंचमाने करण्यात आले. त्यात एकूण ३६ गावांतील शेतकर्‍यांचे विविध पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला. तो शासनाकडे पाठविला. सध्या काही शेतकर्‍यांना मदतीची रक्कम मिळाली असली तरी ती कमी असून, काहींना मदतच मिळाली नसल्याने शेतकर्‍यांना शासनाने वार्‍यावर सोडल्याची भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Embarrassed farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.