दिनेश पाठक, नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् राज ठाकरे यांची भेट बुधवारी (दि.१६) झाली. या भेटीवर नाशिकला पक्षाच्या शिबिरासाठी आलेले उद्धव सेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून आम्ही या भेटीला फारसे महत्व देत नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली.
ते एका गँगचे लीडर आहेत, आज गावी जाणार आहेत. चंद्र आज कुठल्या दिशेने आहे माहित नाही पण त्यांचं नाराजीनाट्य सुरू झालेलं आहे. ते नाराज झाले झाले की गावी जात असतात हे महाराष्ट्राला नवीन नाही. भाजपाने मात्र हे नीट जाणून घ्यावे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. मुंबईत टँकर चालकांचा संप सुरू राहून नागरिकांचे पाण्यासाठी हाल व्हावे यासाठी भाजपाच्याच एका आमदाराने प्रयत्न केला. राज्यात भाजपा जातीय दंगली घडविण्याचे पाप करीत असून राज्य अस्थिर करण्याचे काम सुरू आहे. मुंबईतील गँगवार स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी संपविली. भाजपाच्या काळात सध्या मात्र रोज शुटर बाहेर पडत आहे. भाईगिरी वाढत चालली असल्याची टिका आदित्य ठाकरे यांनी केली.