चार दिवसात काढला आठ हजार क्युबिक मीटर गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 00:08 IST2016-05-09T22:40:57+5:302016-05-10T00:08:22+5:30
कोनांबे : जोपर्यंत गाळ तोपर्यंत उपसा; पिण्याच्या पाण्याची होणार सोय

चार दिवसात काढला आठ हजार क्युबिक मीटर गाळ
सिन्नर : धरणात वर्षानुवर्षे साठलेला गाळ थोड्या अवधीत काढणे शक्य नाही. धरणातून गाळ उपसा करण्याचे काम वर्षात पूर्ण होणार नाही. त्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यात तीन ते चार वर्षे काम करावे लागेल. धरणात जोपर्यंत गाळ आहे तोपर्यंत उपशाचे काम सुरू ठेवले जाईल,असे आश्वासन आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिले.
गेल्या चार दिवसांपासून दोन मशीनच्या साहाय्याने धरणातून गाळ उपशाचे काम सुरू आहे. सुदर्शन रिलिफ फंड, श्री श्री रविशंकर, बाबा रामदेव व शांतीगिरीजी महाराज यांच्या संयुक्त विद्यमाने गाळ उपशासाठी मदत म्हणून तिसरे मशीन उपलब्ध करून देण्यात आले. त्याप्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे बोलत होते. व्यासपीठावर सुदर्शन रिलिफ फंडचे विश्वस्त सुरेश चव्हाणके, सरपंच संजय डावरे, डॉ. राजेंद्र गोऱ्हे, निवृत्ती डावरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक खुळे, मोहन डावरे, भाऊसाहेब शिंदे, रामनाथ डावरे, संजय चव्हाणके, तानाजी पवार आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी कमी कालावधीत जास्तीत जास्त उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवण्यात आल्याचे वाजे म्हणाले. तालुक्याच्या व पश्चिम पट्ट्याच्या दृष्टीने कोनांबे धरणातील जलसाठा खूप महत्त्वाचा आहे. गरज पडल्यास या भविष्यात या धरणातून पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे धरणात गाळ असेपर्यंत काढला जाईल, असे आमदार वाजे यांनी सांगितले. यावर्षी पाऊस सुरू होईपर्यंत धरणातून जास्तीत जास्त गाळ काढला जाईल. पुढच्या वर्षी उन्हाळ्यात कोनांबे धरणापासून गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ केला जाईल. त्यामुळे सुदर्शन रिलिफ फंडाने यापुढेही मदत सुरू ठेवावी, असे आवाहन वाजे यांनी केले.
जलयुक्तच्या कामांकडे नागरिकांनी चळवळ म्हणून पाहावे व श्रमदानातून कामे करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुदर्शन रिलिफ फंडाचे विश्वस्त सुरेश चव्हाणके यांनी केले. लातूर, औरंगाबाद येथे सुदर्शन रिलिफ फंडातून मदत करण्यात आली आहे. आपल्या मातृभूमीत दुष्काळाची कामे सुरू असल्याचे समजताच आपण कोनांबे येथील काम करण्यास मदत दिल्याचे चव्हाणके म्हणाले. केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्कालीन आमदार रख्मिणीबाई वाजे यांच्या प्रयत्नातून ४४ वर्षांपूर्वी कोनांबे धरण झाले होते. अशोक डावरे यांनी सांगून आभार मानले. यावेळी कोनांबे, सोनांबे, जयप्रकाशनगर व सोनारी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)