अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांना नाशिकभूषण पुरस्कार
By Admin | Updated: April 13, 2015 01:27 IST2015-04-13T01:26:42+5:302015-04-13T01:27:25+5:30
अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांना नाशिकभूषण पुरस्कार

अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांना नाशिकभूषण पुरस्कार
नाशिक : अर्थशास्त्र हे मानवी समूहाच्या वागण्याच्या गृहीतकांवर आधारित आहे. त्याचा आधार घेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाद्वारे समूहाचे मन बदलण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कारण गृहीतके सदासर्वकाळ सारखी नसतात. आता मानवी समूहाचे मन बदलण्यासाठी वेगळ्या प्रयत्नांची गरज असल्याचे मत उद्योगपती राम भोगले यांनी व्यक्त केले. रोटरी क्लबच्या वतीने देण्यात येणारा नाशिकभूषण पुरस्कार प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांना त्यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते म्हणाले, सरकार आणि अर्थतज्ज्ञ दरवर्षी अर्थसंकल्पात कररचना बदलून देशातील नागरिकांचे वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करतात. परंतु अर्थशास्त्राचे नियम जर मानवी समूहाच्या गृहीतकांवर आधारित असतील, तर ते सदासर्वकाळ यथार्थ ठरतील याची शाश्वती नाही. यासाठी अर्थतज्ज्ञांनीच आता समूहाचे वर्तन बदलण्यासाठी वेगळा मार्ग शोधून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉ. गोविलकरांसारख्या तज्ज्ञांनी तो जरूर करावा हे सांगतानाच भोगले यांनी गोविलकरांच्या कार्याचा गौरव केला. संघाचे काम करण्यात जेव्हा अनेक अडचणी होत्या अशा काळात गोविलकरांनी रुग्णालयासारखे मोठे काम उभे केले. त्यासाठी समाजाचीही त्यांना साथ लाभली. समाजसेवा करणारे स्वयंघोषित अनेक असतात, परंतु समाजानेही गोविलकरांमधील गुण ओळखूनच त्यांना साथ दिल्याचे भोगले म्हणाले. दीपप्रज्वलन आणि श्याम दशपुत्रे यांनी सादर केलेल्या ईशस्तवनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. रोटरीचे अध्यक्ष मधुकर फटांगरे यांनी स्वागत केले. रतन भंडारी यांनी नाशिकभूषण पुरस्कारामागची भूमिका विशद केली. यानंतर उद्योजक राम भोगले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गोविलकर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रेखा पटवर्धन, बाळासाहेब जोशी, दत्तात्रेय माळोदे, विजय दिनानी, रतन भंडारी, आप्पासाहेब पवार, नीलिमाताई पवार आदि उपस्थित होते. रंजना पाटील आणि रवींद्र शिवदे यांनी सूत्रसंचालन, तर दत्तात्रेय माळोदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)