पाणीटंचाई होणार दूर

By Admin | Updated: February 17, 2016 22:41 IST2016-02-17T22:38:21+5:302016-02-17T22:41:18+5:30

देवळा : चणकापूरमधून सोडलेले पाणी रामेश्वर धरणापर्यंत पोहोचविण्याचे आव्हान

Due to shortage of water shortage | पाणीटंचाई होणार दूर

पाणीटंचाई होणार दूर

 संजय देवरे देवळा
चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिल्यामुळे देवळा शहरातील पाणीटंचाई दूर होणार असून, तालुक्यातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनापुढे मात्र चणकापूर धरणातून कालव्याला सोडलेले पाणी सुरक्षितपणे रामेश्वर धरणापर्यंत पोहोचविण्याचे आव्हान उभे आहे.
गतवर्षी देवळा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. यामुळे सर्व धरणे, पाझर तलाव कोरडे पडले होते. परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने वार्शी, कनकापूर, शेरी, धोडी ही तालुक्याच्या पश्चिम भागातील धरणे भरली. रामेश्वर धरणही काही प्रमाणात भरले. चणकापूर उजव्या कालव्याला सोडण्यात आलेल्या पूरपाण्याने रामेश्वर धरण भरले व या भागाला दिलासा मिळाला असला, तरी तालुक्याचा पूर्व भाग मात्र पाण्यापासून वंचित राहिला असून, सध्या या भागात तीव्र पाणीटंचाई आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना टॅँकरद्वारे उन्हाळ्यात पाणीपुरवठा करावा लागणार आहे. गिरणा नदीला सोडलेले आवर्तन बंद झाल्यामुळे गिरणा नदी कोरडी पडली असून, या पाण्यावर अवलंबून असलेली नऊ गाव पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली आहे. यामुळे देवळा शहराला अनियमित पाणीपुरवठा होत असून, शहरातील उपनगरांमध्ये कमी दाबामुळे पाणी पोहोचत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. गिरणा नदीला पुढील आवर्तन जेव्हा सोडले जाईल तेव्हाच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. परंतु यासाठी अद्याप दीड महिन्याचा कालावधी बाकी आहे, तोपर्यंत शहराला पाणीपुरवठा करावयाचा तरी कोठून, असा प्रश्न देवळा नगरपंचायत प्रशासनापुढे पडला होता. परंतु आता चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडल्यानंतर ह्या कालव्यांतर्गत येणाऱ्या पोटचारीला पाणी सोडून सटवाईवाडी येथील डोण शिवारातील धरण भरण्यात येणार आहे. यामुळे येथील उद्भव विहिरीतील
पाणी सटवाईवाडी येथील जलकुंभात टाकून देवळा शहरासह नऊ गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत होणार असल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे. वरवंडी, मटाणे, वाजगाव या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या या गावांना कालव्याला पाणी आल्यानंतर दिलासा मिळणार आहे.
वाजगाव येथे कोलती नदीत कालव्याचे पाणी पडते. तेथे केटी वेअर आहे. हा केटीवेअर भरल्यानंतर वाजगावला पाणीपुरवठा करणाऱ्या उद्भव विहिरीला पाणी उतरते व गावाचा पाणीपुरवठा सुरळीत होतो. हे केटीवेअर भरल्यानंतर येथून अनधिकृत पाणी उपसा होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.
रामेश्वर धरणातील पाण्यावर पाच गाव पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. यामुळे या पाण्याचा अवैधरित्या उपसा होणार नाही, यासाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार असून, असे प्रकार करणाऱ्यावंर कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत
म्हणजे ह्या प्रकारांना आळा
बसेल. परंतु पाटबंधारे विभागाला पोलीस, वीज वितरणचे सहकार्य मिळाले तर पाणीचोरी थांबवता येईल. (वार्ताहर)

Web Title: Due to shortage of water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.