जुन्या घंटागाड्यांचे आयुर्मान संपुष्टात

By Admin | Updated: September 4, 2016 01:05 IST2016-09-04T00:59:46+5:302016-09-04T01:05:39+5:30

महापालिका : मक्तेदारांना नवीन घंटागाड्या खरेदी करणे अपरिहार्य

Due to the old life of the Ghumghar | जुन्या घंटागाड्यांचे आयुर्मान संपुष्टात

जुन्या घंटागाड्यांचे आयुर्मान संपुष्टात

 नाशिक : महापालिकेच्या मालकीच्या घंटागाड्यांचे आयुर्मान संपल्यानंतर त्या बदल्यात नवीन वाहन मक्तेदाराने तत्काळ स्वखर्चाने रस्त्यावर आणले पाहिजे, अशी अट निविदाप्रक्रियेत घालण्यात आली असली तरी स्थायी समितीने सर्वच्या सर्व २५२ घंटागाड्या नवीनच असल्या पाहिजेत, असा आदेश काढला आहे. मनपाच्या १२१ घंटागाड्या खरेदी करून आठ वर्षे उलटली असून वाहनांची ‘खटारा’ स्थिती बनलेली आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत मक्तेदारांना नवीन घंटागाड्या खरेदी करणे अपरिहार्य बनले आहे.
महापालिकेने सन २००८ मध्ये स्वमालकीच्या १२१ घंटागाड्या खरेदी केल्या होत्या. त्यासाठी त्यावेळी साडेसात कोटी रुपये मोजण्यात आले होते. घंटागाड्या घेतल्यानंतर ठेक्यावरून वाद झडल्याने त्या सुमारे दीड वर्ष एकाच ठिकाणी वापराविना पडून होत्या. गाड्या एकाच ठिकाणी राहिल्याने अनेक गाड्यांना गंज तसेच टायर निकामी झाले होते. या प्रकरणी महासभेत वारंवार प्रशासनाला धारेवर धरले जात होते. गाड्यांचे पासिंगही सुमारे वर्षभरानंतर करण्यात आले होते. दरम्यान, घंटागाड्यांचा ठेका दिल्यानंतर मक्तेदारांना मनपाच्या मालकीची ही वाहने प्रतिमाह भाड्याने देण्यात आली. तेव्हापासून गाड्या मक्तेदाराकडून वापरल्या जात आहेत. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांचे सर्वसाधारणपणे आयुर्मान हे ७ ते ९ वर्षे असते. त्यामुळे मनपाच्या घंटागाड्यांचे आयुर्मान कधीच संपुष्टात आले आहे.
ज्या गाड्यांची देखभाल-दुरुस्ती नियमित होत असेल त्याच गाड्या फारतर वर्षभर चालू शकतील. परंतु, रस्त्यावर धावणाऱ्या घंटागाड्यांची एकूणच ‘खटारा’ स्थिती पाहता त्यांचा वापर होणे अवघडच मानले जात आहे. स्थायी समितीने घंटागाड्यांचा पाच वर्षांसाठी ठेका मंजूर केला आहे. निविदाप्रक्रियेत टाकण्यात आलेल्या अटीनुसार घंटागाड्यांचे आयुर्मान संपल्यानंतर त्याबदल्यात नवीन वाहने मक्तेदाराने तत्काळ खरेदी करावयाची आहेत. काही घंटागाड्या सुस्थितीत असल्याचे दाखविण्यात आले तरी त्यांचा फारतर आणखी वर्षभराच्या कालावधीसाठी वापर करता येऊ शकेल. परंतु कोणत्याही स्थितीत मक्तेदारांना नवीनच घंटागाड्या खरेदी करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी नवीन घंटागाड्याच धावल्या पाहिजेत, असा आदेश काढल्याने त्यानुसार कार्यवाही करण्याची जबाबदारीही आरोग्य विभागावर येऊन पडली आहे. स्थायीकडून घंटागाडीच्या ठेक्याचा ठराव आल्यानंतर पुढे तीन आठवड्याने प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली जाणार असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the old life of the Ghumghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.