पुस्तकेच न मिळाल्याने ‘मुक्त’चे विद्यार्थी अडचणीत
By Admin | Updated: January 31, 2016 00:01 IST2016-01-30T23:59:02+5:302016-01-31T00:01:56+5:30
मनविसेचे निवेदन : नुकसान झाल्यास विद्यापीठच जबाबदार

पुस्तकेच न मिळाल्याने ‘मुक्त’चे विद्यार्थी अडचणीत
नाशिक : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने सुरू केलेली घरपोच पुस्तके देण्याची योजना अयशस्वी ठरली असून, त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नसून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास विद्यापीठच जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
मुक्तविद्यापीठाच्या कारभाराच्या विरोधात मनसेने हाच मुद्दा घेऊन कुलगुरूंना निवेदन दिले असून, विद्यापीठाने अभ्यासकेंद्रांच्या माध्यमातून पुस्तके दिली असती तर विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळाली असती; परंतु तसे न झाल्याने आजही हजारो मुलांना पुस्तके मिळाली नाही आणि येत्या एक ते दोन महिन्यांत परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाला साधनेच मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठाने तातडीने हा प्रश्न सोडवावा अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास जबाबदारी विद्यापीठाची राहील तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी विद्यापीठ लवकरच या विषयावर तोडगा काढेल, असे नमूद केले आहे. यावेळी कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे आणि अनिल थोरात उपस्थित होेते. मनसे विद्यार्थी सेनेचे संदीप भंवर, गणेश वाळके, मनोज घोडके, ललित ओहोळ, सौरभ सोनवणे, देवा दाते, तुषार मटाले, किरण बेलेकर, सुधाकर टावरे, संजू जोशी, संजय देवरे, कौशल पाटील, राकेश परदेशी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)