केबीसीमुळे नात्यांमध्ये ‘दुरावा’
By Admin | Updated: July 27, 2014 01:52 IST2014-07-27T00:56:51+5:302014-07-27T01:52:49+5:30
केबीसीमुळे नात्यांमध्ये ‘दुरावा’

केबीसीमुळे नात्यांमध्ये ‘दुरावा’
संदीप झिरवाळ
पंचवटी
अल्पावधीतच मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या केबीसी मल्टीट्रेड कंपनीमुळे नात्यांत दुरावा निर्माण झाला आहे. एजंटगिरीतून सगेसोयरे, आप्तेष्टांनी गुंतवणूक केली खरी; मात्र पैसे बुडाल्यामुळे सख्खे वैरी बनले आहेत.
लोकांनी मोठ्या अपेक्षेने केबीसीत लाखो रुपयांची गुंतवणूक केली; मात्र केबीसीचे संचालक फरार झाल्याने पैसे बुडाल्याच्या भीतीने अनेकांनी धास्ती घेतली, तर केबीसीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देणाऱ्या जवळच्या नातेवाइकांत दुरावा निर्माण झाला आहे. केबीसी कंपनीत गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळणार की नाही याबाबत स्पष्टता नसल्याने रक्ताच्या नात्यात फूट पडली आहे. याचा प्रत्यय पोलीस ठाण्यात दाखल होत असलेल्या तक्रारींवरून दिसून येतो. केबीसीत एजंटगिरी करणाऱ्यांनी आपल्या जवळच्या नातेवाइकांना गुंतवणुकीबाबत सल्ला देऊन गुंतवणूक करण्यास उद्युक्त केले होते; मात्र कंपनीने गाशा गुंडाळल्याने एजंटांसह जवळचे नातेवाईकही अडचणीत सापडल्याने नात्यांची वीण सध्या सैल पडली आहे. अनेक नातेवाईक, सगेसोयऱ्यांनी आता थेट ज्या एजंटमार्फत गुंतवणूक केली होती त्याच्याकडे जाऊन पैशाचा तगादा लावल्याने मध्यस्थीचे काम करणाऱ्या एजंट व नातेवाईक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. एजंट यानिमित्ताने चांगलेच अडचणीत सापडले आहेत. काही नातेवाइकांचे पैसे एजंटगिरी करणाऱ्या नातेवाईकांनी परत देण्याचे मान्य केले असले, तरी ते कधी मिळतील हे स्पष्ट न केल्याने सध्या रक्ताच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. जवळच्या नातेवाइकांनी केबीसी एजंटच्या घराची पायरी न चढण्याच्या आणाभाका घेतल्याचे समजते. (वार्ताहर)