मोसम खोऱ्यात जोरदार पावसाने दिलासा

By Admin | Updated: September 22, 2015 22:39 IST2015-09-22T22:38:21+5:302015-09-22T22:39:19+5:30

दु:खावर फुंकर : बळीराजाला रब्बी पिकांबाबत आशा; घरांची पडझड

Due to heavy rains in the Valley of the Season | मोसम खोऱ्यात जोरदार पावसाने दिलासा

मोसम खोऱ्यात जोरदार पावसाने दिलासा

जायखेडा : मोसम खोऱ्यात जायखेड्यासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, गेल्या काही महिन्यांपासून दुष्काळसदृश स्थितीने पोळलेल्या बळीराजाच्या दु:खावर पावसाने काहीशी फुंकर घातली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत होत्या. पावसाअभावी शेतीव्यवसाय पूर्णपणे अडचणीत आल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला होता. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना या भागातील ग्रामस्थांना करावा लागत होता. सुदैवाने गुरुवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यरात्रीपासून परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. आकाशाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी त्यामुळे सुखावला असून, सर्वत्र उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्री सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत जोरदारपणे सुरू होता. त्यानंतर शनिवार व रविवारी कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी बरसत होत्या. परतीच्या पावसाने किरकोळ प्रमाणात काही पिके वगळता अन्य गेलेली पिके हाती येणार नसली तरी जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागणार आहे.
गेल्या दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी अनेक जणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात शेतपिकांबरोबरच अनेक घरांची पडझड झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जायखेडा येथील हनुमान चौकातील अनुसयाबाई पोपट खैरनार यांच्या राहत्या घराचे छत कोसळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने त्यांच्या कुटुंबीयांनी जोरदार पावसाचा अंदाज घेऊन दुसरीकडे आश्रय घेतल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचप्रमाणे न्यू प्लॉटमध्ये राहणारे अपंग गृहस्थ साईनाथ नहिरे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. यावेळी नहिरे हे भिंतीला टेकून बसलेले होते. सुदैवाने त्यांच्या विरुद्ध दिशेला भिंत पडल्याने अनर्थ टळला. त्याचबरोबर जायखेडा व परिसरातील अनेक घरांची कमी अधिक प्रमाणात पडझड झाली आहे.
नदीकाठावरील व परिसरातील सर्वच गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच लोकांना एक दिवसाआड आणि तेही एकच वेळ पिण्याचे पाणी मोठ्या मुश्किलीने मिळत होते. सुदैवाने या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. हरणबारी धरण ओव्हरफ्लो होऊन पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
पूरपाणी पाटचाऱ्यांना सोडा : मागणी
गिरणा नदीचे पूरपाणी
गिरणा उजव्या व डाव्या कालव्याला सोडावे, अशी मागणी मालेगाव तालुका कॉँग्रेसतर्फे कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सध्या गिरणा नदीतून पुराचे पाणी वाहत आहे. पूनद, चणकापूर, हरणबारी धरणाची पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे गिरणा नदीचे पाणी उजव्या व डाव्या कालव्याला सोडल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे विहिरींनाही पाणी उतरेल. ब्राह्मणगाव, तळवाडे, पिंपळगाव, दाभाडी, रावळगाव, आघार, ढवळी विहीर, लखमापूर या गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मालेगाव तालुक्यातील सौंदाणे, टाकळी, सोनज, टेहरे, मुंगसे, वाके, कौळाणे, मांजरे, वऱ्हाणे या गावांतील के.टी. बंधारे, पाझर तलाव भरले जातील. नद्या-नाल्यांना पाणी सोडल्याने ते वाहू लागतील. यंदा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची पिके जळाल्याने त्यांच्या हातातून घास हिरावला गेला आहे. जनावरांना चारा राहिलेला नाही, तर काही गावांतील लोकांना पिण्याचे पाणी नसल्याने वणवण भटकंती करावी लागत आहे. मोसम नदीसह गिरणा कालव्याला पाणी सोडल्यास बंधारे भरले जातील. त्यामुळे पाणीटंचाई काहीअंशी दूर होईल. मोसम नदीसह गिरणा कालव्याला पाणी सोडावे, असे पत्रकात म्हटले आहे.
निवेदनावर कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. तुषार शेवाळे, तालुका कॉँग्रेस अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेवाळे, संगीता बच्छाव, सतीश पगार, संजय पाटील यांच्या सह्या आहेत.
पूरपाणी सोडण्याची मागणी
ब्राह्मणगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा नदी वाहू लागली असून, सदर पूरपाण्याने लहानमोठे तलाव, चाऱ्या, पोटचाऱ्यांना पाणी सोडल्यास जनावरांसह लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल व पिकांनाही जीवदान मिळेल, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने चणकापूर, पूनद ही धरणे भरून पूरपाणी नदीत वाहत आहे. मात्र तालुक्यातील लहान बंधारे अद्याप कोरडे आहेत. पूरपाणी सोडून गिरणा कालव्यातील पाण्याने लहान बंधारे त्वरित भरल्यास परिसरातील गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पाटबंधारे विभागाने त्वरित पूरपाणी सोडावे व पोटचाऱ्या भरून द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली
आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to heavy rains in the Valley of the Season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.