देवपूर परिसरात मोरांचे अस्तित्व धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:11 IST2018-04-23T00:11:23+5:302018-04-23T00:11:23+5:30
एकेकाळच्या निसर्गरम्य व राष्टय पक्षी मोरांचे थवे जागोजागी दिसणाऱ्या देवपूर गावात मोरांचे अस्तित्व धोक्यात आल्याने निसर्ग-प्रेमींकडून चिंता व्यक्त होत आहे.

देवपूर परिसरात मोरांचे अस्तित्व धोक्यात
देवपूर : एकेकाळच्या निसर्गरम्य व राष्टय पक्षी मोरांचे थवे जागोजागी दिसणाऱ्या देवपूर गावात मोरांचे अस्तित्व धोक्यात आल्याने निसर्ग-प्रेमींकडून चिंता व्यक्त होत आहे. निसर्गाचे वरदान लाभलेले गाव म्हणून पूर्वी देवपूरची ओळख होती. गावात प्रवेश करताच दृष्टीस पडणारी खळखळ वाहणारी देवनदी, काठावर असलेल्या पेरू, सीताफळ, बोरांच्या बागा मनाला उल्हसित करीत असत. निसर्गाच्या या सान्निध्यात राष्टÑीय पक्षी मोरांचे थवे निर्भयपणे बागडताना आढळून यायचे. येथील नागरिकांना ही बाब नित्याची झाली असली तरी हे दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी पाहुणेमंडळी आवर्जून देवपुरात यायची व हरखून जायची. तथापि, आता मात्र येथील चित्र बदलले आहे. एरवी उन्हाळ्यातही तुडुंब असणारे देवनदीचे पात्र आता कोरडेठाक पडते आहे. पाणी कमी झाल्याने बागाही कमी झाल्या असून, वृक्षतोडीमुळे सहज उपलब्ध होणारा रानमेवा आता खूपच कमी प्रमाणात दिसू लागला आहे. आजही फळझाडे तुरळक प्रमाणात दिसून येतात. त्यांच्या आश्रयाने फिरणारे मोरही आढळून येतात. तथापि, त्यांना अन्नपाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे पाहावयास मिळते. नदीला पाणी नाही व फळबागातून पुरेसे अन्न मिळत नाही त्यामुळे मोरांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. नदीच्या कडेला त्यांच्या पाण्यासाठी ओहोळ बांधण्याची गरज आहे. तथापि, तसे होत नसल्याने मोरांचे गाव असलेल्या देवपुरातून मोर हद्दपार होण्याची भीती निर्माण झाली आहे. वनखात्याकडून या राष्टय पक्षाच्या रक्षणासाठी काहीही उपाय-योजना केल्या जात नसल्याने येथील मोरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.