नाशिक : दुष्काळी परिस्थितीत पाणी अडवा, पाणी जिरवा हा उपक्रम जास्तीत जास्त ठिकाणी राबविण्याची गरज असून, त्यासाठी प्रशासन आवश्यक ते सहकार्य करणार आहे. सिद्धपिंप्री येथे ग्रामपंचायत, पंचायत समिती व लोकसहभागातून शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर तीन बंंधाऱ्यांची खोली वाढविण्याचा उपक्रम स्तुत्य असून, असे उपक्रम जिल्ह्यात सर्वत्र राबविले गेले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले.सिद्धपिंप्री येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या तीन बंधाऱ्यांतील गाळाचा उपसा व बंधारे खोलीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, पंचायत समिती उपसभापती अनिल ढिकले, शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खालापूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे, गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी आदि उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक करताना यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व सहकार्य राहील, असे स्पष्ट केले. जलयुक्त शिवार योजनेतून तीन बंधाऱ्यांच्या गाळाचा उपसा व खोलीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य अलका नंदकिशोर साळुंखे, सरपंच निर्मला निवृत्ती ढिकले, सुकदेव पवार, अंबादास ढिकले, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग ठोके आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दुष्काळी परिस्थितीत ‘शिरपूर पॅटर्न’ आवश्यक
By admin | Updated: April 5, 2016 23:22 IST