स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचले पिण्याचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:45 IST2020-02-29T21:44:10+5:302020-02-29T21:45:05+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील चौराईवाडी येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पिण्याचे पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांसह महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

अडसरेच्या चौराईवाडीत पाइपलाइनने पाणी पोहोचून येथील महिलांना पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे नळ उघडे करून देताना सरपंच संतू साबळे, वामन साबळे, राम शिंदे, धोंडू कातोरे आदींसह महिला व ग्रामस्थ.
राजेंद्र गायकवाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील चौराईवाडी येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पिण्याचे पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांसह महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या सह्याद्रीच्या कड्याकपारीत दुर्गम म्हैसवळण घाटमाथ्याच्या पायथ्याशी असलेल्या चौराईवाडीतील ग्रामस्थांना आजवर पिण्याचे पाणी मिळाले नव्हते. अडसरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच संतू साबळे यांनी ही अत्यंत गरजेची समस्या अखेर सोडविली. अडसरे येथे दोन तीनशे लोकसंख्या असलेल्या चौराईवाडीत सण २०१२ मध्ये आदिवासी उपाययोजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. या वाडीत पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण झाले होते. त्या टाक्यांमध्ये आजपर्यंत पिण्याचे पाणी आले नव्हते, मात्र सरपंच संतू साबळे यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेत स्वत: ग्रामपंचायतीच्या निधीतून खर्च करून पाणीपुरवठा योजनेचा निधी ग्रामपंचायतीवर वर्ग नसतानादेखील गावच्या मुख्य विहिरीतून ते या तीन किलोमीटर दूर अंतर असलेल्या चौराईवाडीपर्यंत पाइपलाइन करून ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला.चौराईवाडीतील महिलांची पाण्यासाठीची रोज तारेवरची कसरत होत होती. अखेर मी ग्रामपंचायत निवडणूक काळात येथील ग्रामस्थांना शब्द दिला होता की, मी निवडून येवो अथवा ना येवो मी आपला पाणीप्रश्न सोडविणार. याच मुद्द्यावर मला जनतेने भरघोस मताधिक्याने सरपंच बनविले. त्यानंतर मी सर्वांना एकत्र घेऊन चार-पाच महिन्यांत महिलांचा डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला. - संतू साबळे, सरपंच, अडसरे
घरापर्यंत नळ
ग्रामस्थांना थेट घरापर्यंत पाइपलाइन करून ग्रामस्थांच्या दारापर्यंत पहिल्यांदाच पिण्याच्या पाण्याचे नळ पोहोचविले. या वाडीत पहिल्यांदाच पाणी पोहोचून गेल्या आठ-दहा वर्षांपासून रिकाम्या असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी आणल्याने व कायमचा पाणीप्रश्न मिटल्याने येथील ग्रामस्थांनी गावचे सरपंच संतू साबळे, उपसरपंच वामन साबळे, ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम कातोरे, शंकर भांगरे, शिवाजी चौरे, जयश्री जाधव, अर्चना साबळे, ज्योती चौरे, कर्मचारी काळू चौरे यांचे आभार मानले.