जमिनी घेऊन रान पेटविण्याची वेळ आणू नका

By Admin | Updated: July 2, 2016 00:28 IST2016-07-02T00:22:41+5:302016-07-02T00:28:05+5:30

जितेंद्र आव्हाड : गोंदेच्या शेतकरी मेळाव्यात मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वेला कडाडून विरोध

Do not take the time to paint the land with the land | जमिनी घेऊन रान पेटविण्याची वेळ आणू नका

जमिनी घेऊन रान पेटविण्याची वेळ आणू नका

सिन्नर : शासन एक्स्प्रेस वे कशासाठी करत आहे तेच कळत नाही. तो इंडस्ट्रीयल बेल्टचा भाग नाही. मग मार्ग करण्याचा अट्टहास का, असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी मंत्री व आमदार जितेेंद्र आव्हाड यांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचे पाप करू नका, अशा शब्दात शासनाला सुनावले. उगाच शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करून रान पेटवण्याची वेळ आणू नका, असा सज्जड दमच आमदार आव्हाड यांनी सरकारला भरला.
सिन्नर तालुक्यातल्या गोंदे येथे मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वेच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार आव्हाड बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री तुकाराम दिघोळे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड, तानाजी जायभावे, विष्णुपंत म्हैसधुणे, पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र घुमरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, डॉ. विष्णू अत्रे, शांताराम ढोकणे, हरिभाऊ तांबे, दिग्विजय गर्जे, रामदास जायभावे, सरपंच उषा सोनवणे, भरत तांबे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी येथील शेतकऱ्यांना विश्वास घेऊन त्यांच्याशी संपर्क साधणे गरजेचे होते. मात्र कोणतेही माहिती न दिल्याने शेतकरी घाबरले असल्याचे आव्हाड म्हणाले. जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊन आणि जे येणार नाही त्यांच्याशिवाय लढा सुरुच ठेवणार असल्याचे आव्हाड म्हणाले. जोपर्यंत या आंदोलनाचा मार्ग दिसत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना गावबंदी करा असे आव्हाड यांनी शेतकऱ्यांना सांगितले. या लढ्यात विशेषत: महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. डी. एल कराड यांनी शेतकऱ्यांना गुळवंच व मुसळगावच्या शेतकऱ्यांचा अनुभव समोर ठेवा असे सांगितले. शेतकऱ्यांची दीड लाखाने घेतलेली जमिन एक ते दोन कोटी रुपयांना विकली जात असल्याचे ते म्हणाले. या महामार्गासंबंधात आपली जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरुन दलालांची सोय करण्याचा विचार असल्याचे आपल्याला जाणवल्याचे ते म्हणाले. जमिनीपेक्षा किंमतीवान दुसरे काही नाही. त्यामउळे एकत्रीत लढा दिल्यास सरकारला निर्णय बदलायला भाग पडेल असे ते म्हणाले. हातपाय गाळू नका. एक इंचही जमिन लबाडांच्या घशात जाता कामा नये असे आवाहन डॉ. कराड यांनी केले. यावेळी तुकाराम दिघोळे यांनी शेतकरी हाच पक्ष मानून सर्व पक्षीयांनी लढ्यात एकत्र यावे असे आवाहन केले. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी मनोगतातून जमिनी देण्यास कडाकडून विरोध केला. (वार्ताहर)

Web Title: Do not take the time to paint the land with the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.