चार लाख रुपये नुकसान भरपाईच्या बनावट मेसेजमुळे जिल्हा प्रशासनापुढे उभा राहिला पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST2021-09-02T04:30:06+5:302021-09-02T04:30:06+5:30
नाशिक: कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना आपत्ती विभागाकडून चार लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल ...

चार लाख रुपये नुकसान भरपाईच्या बनावट मेसेजमुळे जिल्हा प्रशासनापुढे उभा राहिला पेच
नाशिक: कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना आपत्ती विभागाकडून चार लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात गेल्या काही दिवसात दोन हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारची कोणतीही योजना नसताना आलेल्या अर्जांचे करायचे काय, असा पेच प्रशासनापुढे उभा राहिला आहे.
कोरोनामुळे दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून आर्थिक मदत केली जाणार असल्याचा मेजेस गेल्या पंधरा दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संबंधित कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याच्या आशयाचा हा मेसेज असून, मदतीसाठी करावयाचा अर्ज, न्यायालयाचा निकाल आणि मंत्रालयाचे पत्र असेदेखील पुष्ठ्यर्थ जोडण्यात आलेले आहेत.
--इन्फो--
आपत्ती व्यवस्थापनाकडे आले दोन हजार अर्ज
आपत्ती व्यवस्थापन विभागाचा उल्लेख असलेला मेसेज फिरत असल्याने नाशिकच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागात दररोज अर्ज दाखल होत आहेत. जिल्हाभरातून आलेले अर्ज काही टपालातून प्राप्त झाले आहेत, तर काहींनी प्रत्यक्ष कार्यालयात आणून दिले आहेत. काहींनी आवक - जावक विभागात अर्ज जमा केले.
--इन्फो--
अर्जांना उत्तर देण्याची वेळ
अशा प्रकारची योजनाच अस्तित्वात नसल्यामुळे आलेल्या अर्जांना उत्तर देण्याची वेळ जिल्हा प्रशासनापुढे आली आहे. या अर्जांना उत्तर दिले नाही तर त्यांच्याकडून सातत्याने विचारणा होण्याची तसेच मदतीच्या प्रतीक्षेत राहतील. त्यामुळे त्यांना अशी कोणतीही योजना नसल्याबाबबते पत्र उलट टपाली पाठविले जाण्याबाबतचा विचार केला जात आहे.
---इन्फो--
काय आहे बनावट मेसेज
कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तिच्या कुटुंबीयांना केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून ४ लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार आहे. सोबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची बातमी, शासन आदेश, क्लेम फॉर्म जोडण्यात आलेले आहेत. गरजूंनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात अर्ज सादर करावा.
---कोट--
अशा प्रकारची कोणतीही योजना केंद्र किंवा राज्य शासनाकडून कळविण्यात आलेली नाही. हा बनावट मेसेज असून नागरिकांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष करावे.
- अर्जुन कुऱ्हाडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख. नाशिक.