कुंदेवाडी बंधाऱ्यात विसर्जनास बंदी
By Admin | Updated: September 6, 2016 22:54 IST2016-09-06T22:53:52+5:302016-09-06T22:54:02+5:30
कुंदेवाडी बंधाऱ्यात विसर्जनास बंदी

कुंदेवाडी बंधाऱ्यात विसर्जनास बंदी
सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी येथील साठवण बंधाऱ्यांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनास बंदी घालण्याची मागणी शिवस्वराज्य फाउंडेशनच्या वतीने पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
देवनदीवर कुंदेवाडी शिवारात तीन साठवण बंधारे आहेत. या बंधाऱ्याजवळ असलेल्या विहिरीमधूनच गावासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. गावासाठी स्वतंत्र अशी शासकीय पाण्याची व्यवस्था नसून सध्यातरी गावाला साठवण बंधाऱ्यालगत असलेल्या खासगी विहिरींमधूनच पिण्यासाठी पाणीपुरवठा होत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
हे तीनही बंधारे सिन्नरजवळ असल्याने शहरातील जवळपास पन्नास टक्के या बंधाऱ्यामध्ये गणेशमूर्ती विसर्जित करतात. मोठ्या प्रमाणात विसर्जन झालेल्या गणेशमूर्तींच्या रासायनिक माती व रंगासह निर्माल्यामुळे या बंधाऱ्यातील पाणी प्रदूषित होते. दूषित झालेले हे पाणी विहिरींच्या पाण्यात मिसळत असल्याने ग्रामस्थांना आजारांना सामोरे जावे लागते. जलप्रदूषण रोखण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणारे अभियान व उपक्रम लक्षात घेऊन कुंदेवाडी येथील साठवण बंधाऱ्यांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनास बंदी घालण्याची मागणी शिवस्वराज्य फाउंडेशनचे भाऊसाहेब नाठे, सुरेश कुऱ्हाडे, बाळासाहेब नाठे, हेमंत माळी, ग्रामपंचायत सदस्य रतन नाठे,
संदीप माळी, संगीता नाठे, सविता माळी, पूनम कुऱ्हाडे, अनिल दोडके, प्रकाश माळी, मंगेश नाठे, अनिल पोटे, मंगेश माळी, सुनील माळी, संजय गाडेकर, गोरख सोनवणे, माणिक चव्हाणके, विजय माळी, पांडुरंग गोळेसर, संजय माळी, उद्धव माळी यांनी केली आहे. (वार्ताहर)