अधिकाऱ्यांमध्ये बदलीच्या धसक्याने अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 19:04 IST2019-01-28T19:03:38+5:302019-01-28T19:04:36+5:30
यंदा निवडणूक आयोगाने निवडणुकीशी संबंधित असलेल्या खात्याच्या अधिका-यांच्या बदल्यांचे धोरण स्वीकारले असून, त्यात प्रामुख्याने महसूल व पोलीस खात्याचा समावेश आहे. साधारणत: मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होऊन निवडणूक कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होणार

अधिकाऱ्यांमध्ये बदलीच्या धसक्याने अस्वस्थता
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शी पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने वर्षानुवर्षे एकाच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व अधिका-यांच्या बदल्या करण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे महसूल खात्याच्या अधिका-यांमध्ये बदलीच्या धसक्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे. यात तहसीलदार, उपजिल्हाधिकारी संवर्गाचा समावेश असल्यामुळे अलीकडच्या काळात स्व जिल्ह्यात परतलेल्या अधिकाºयांनी पुन्हा सोयीसाठी बदल्या करून घेण्यासाठी धावाधाव सुरू केली असून, दुसरीकडे बदलीपात्र अधिकाºयांच्या संपूर्ण माहितीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी मंत्रालयात सादर केला आहे.
यंदा निवडणूक आयोगाने निवडणुकीशी संबंधित असलेल्या खात्याच्या अधिका-यांच्या बदल्यांचे धोरण स्वीकारले असून, त्यात प्रामुख्याने महसूल व पोलीस खात्याचा समावेश आहे. साधारणत: मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होऊन निवडणूक कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने तत्पूर्वीच मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार आहे. नाशिक विभागात प्रामुख्याने ४६ उपजिल्हाधिकारी व ६० तहसीलदारांच्या बदल्या होतील, असा अंदाज असल्याने त्याबाबतची माहिती विभागीय आयुक्तांनी प्रत्येक जिल्हाधिका-यांकडून अधिका-यांची माहिती मागविली आहे. त्यात प्रामुख्याने स्वजिल्ह्यातील रहिवासी असलेले अधिकारी, एकाच पदावर कार्यरत असलेले व ३१ मे २०१९ रोजी तीन वर्ष पूर्ण होत असलेले, जिल्ह्यात गेल्या चार वर्षांतील तीन वर्षे कार्यरत असलेले, गेल्या वर्षभरात लोकसभा व विधानसभा निवडणूक पार पाडलेले अधिकारी तसेच ज्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशा अधिका-यांचा समावेश आहे. त्यामुळे बदली होणा-या अधिका-यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, याबाबतची सारी माहिती घेऊन विभागीय आयुक्तालयाने अधिका-यांच्या बदल्यांचे प्रस्ताव तयार करून ते मंत्रालयात रवाना केले आहेत. मात्र निवडणुकीच्या काळात गैरसोयीच्या बदल्या होण्याच्या धसक्याने अधिका-यांमध्ये अवस्थता निर्माण झाली आहे. काही अधिका-यांच्या पाल्यांच्या ऐन परीक्षांच्या कालावधीत बदल्यांमुळे स्थलांतराची वेळ आल्याने अधिका-यांची धावपळ उडाली आहे. त्यामुळे सोयीच्या ठिकाणी बदलून जाण्यासाठी लगतच्या जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेल्या अथवा होऊ पाहणा-या जागांची माहिती गोळा केली जात असून, अशा जागांवर बदली व्हावी यासाठी धावाधाव केली जात आहे. साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बदल्यांचे आदेश निघतील, असा अंदाज व्यक्त केला जात असून, तत्पूर्वी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.