वैद्यकीय प्रवेशापासून विद्यार्थी वंचित
By Admin | Updated: September 13, 2016 01:30 IST2016-09-13T01:30:18+5:302016-09-13T01:30:31+5:30
घोळ प्रवेशाचा : खासगी, अभिमतचे स्वतंत्र वेळापत्रक; राज्यातील विद्यार्थ्यांकडून नाराजी

वैद्यकीय प्रवेशापासून विद्यार्थी वंचित
नाशिक : वैद्यकीय विद्याशाखेच्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेला आव्हान देत खासगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाने ऐनवेळी न्यायालयाकडून स्थगिती मिळविल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. या स्थगितीमुळे राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना अभिमत आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे दरवाजे खुले झाले असून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या जागांवर आता परराज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. या प्रकारानंतर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही न्यायालयात याचिका दाखल केली असून, येत्या बुधवारी यासंदर्भातील सुनावणी होणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश हे नीटनुसारच करण्यात यावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील १७ खासगी आणि १० अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली होती. ३० आॅगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच एक खासगी आणि दंत महाविद्यालयांनी न्यायालयात या प्रक्रियेला आव्हान देत प्रवेशप्रक्रिया केवळ ८५ टक्केमहाराष्ट्राच्या कोट्याप्रमाणे न राबविता आॅल इंडिया पातळीवर राबविण्यात यावी अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने याचिका दाखल करून घेत पूर्वीच्या प्रवेशप्रक्रिया स्थगित करून आॅल इंडिया स्तरावर प्रवेशप्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी अडचणीत आले आहेत.
महाराष्ट्रामध्ये १७ खासगी व दहा अभिमत महाविद्यालये आहेत. त्यातील एमबीबीएसची प्रवेश क्षमता ही ३५००, तर बीडीएसची प्रवेशक्षमता ३००० इतकी आहे. या दोन्ही शाखा मिळून सुमारे ६५०० प्रवेश हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हक्काचे असताना या जागांवर परराज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देता कामा नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
केंद्रीय प्रवेशप्रक्रियेला स्थगिती मिळविल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे हाल झाले आहेत. अभिमत आणि खासगी महाविद्यालयांनी आपल्या संस्थेचे प्रवेश वेळापत्रक जाहीर करताना तीन ते चार महाविद्यालयांनी एकाच दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलविले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र डी. डी. लागत असल्याने विद्यार्थी, पालकांची प्रचंड ओढाताण होत आहे. या त्रासामुळे अनेक विद्यार्थी हे प्रवेशापासून वंचित राहत असून, या जागांवर परप्रांतियांना प्रवेश देण्याचा आग्रह खासगी आणि अभिमत महाविद्यालयांकडून धरला जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. नाशिकमधील काही विद्यार्थ्यांनी याप्रकरणी मोहीम उघडली असून, मंत्रिमंडळाने यात लक्ष घालावे, अशी मागणी करताना जिल्ह्यातील मंत्र्यांना निवेदने दिली जात आहेत.