दिगंबरच्या खालशांचा वाद मिटला
By Admin | Updated: August 27, 2015 00:13 IST2015-08-27T00:12:36+5:302015-08-27T00:13:07+5:30
दिगंबर आखाडा बैठक : महंत गंगादास यांची मध्यस्थी

दिगंबरच्या खालशांचा वाद मिटला
पंचवटी : मागील तीन दिवसांपासून दिगंबर आखाड्याने बहिष्कृत केलेले तीन खालसे व आखाडा यांच्यात चतु:संप्रदायाच्या ध्वजावरून रंगलेल्या वादाला दिगंबर आखाड्याच्या महंत व बहिष्कृत केलेल्या खालशाच्या महंतांनी अखेर पूर्णविराम दिल्याने आखाडा व खालशांत सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. दिगंबर आखाड्यात झालेल्या महंत व बहिष्कृत खालशाचे महंत यांच्यात वाद मिटविण्यासाठी नेमण्यात आलेल्या ११ जणांच्या समितीच्या माध्यमातून हा वाद मिटविण्यात आला. त्यानंतर बहिष्कृत केलेल्या खालशाचे महंत व दिगंबर आखाड्यांच्या महंतांनी जय सीताराम, हनुमानाचा जयघोष करीत एकमेकांची गळाभेट घेऊन आपापसातील मतभेद विसरून पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. दिगंबर आखाडा जगन्नाथपुरीचे महंत गंगादास यांच्या मध्यस्थीने या वादावर पडदा पडला आहे.
चतु:संप्रदायच्या ध्वजावरून, तसेच महंतांचा अपमान केल्याच्या कारणावरून दिगंबर आखाड्याचे महंत व खालसे यांच्यात वाद निर्माण झाला होता. याच वादातून दिगंबर आखाड्याच्या महंतांनी बैठक घेऊन महात्यागी कॅम्पच्या महंत सीतारामदास, डाकोरचे महंत माधवाचार्य व तेराभाई त्यागीचे महंत बृजमोहनदास यांच्या खालशांवर बहिष्कार टाकत त्यांना शाहीस्नानाला बरोबर न नेण्याची भूमिका घेतली होती. आखाडा व खालशाचे महंत यापैकी कोणीही माघार घ्यायला तयार नसल्याने दिवसेंदिवस वाद वाढतच चालला होता. आखाडा व बहिष्कृत खालशांचे वाद मिटावे, यासाठी बुधवारी सकाळी दिगंबर आखाड्यात बैठक घेण्यात येऊन ११ खालशांच्या सदस्यांची समिती नेमण्यात आली व त्या समितीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुपारी दिगंबर आखाड्याचे महंत कृष्णदास, महंत रामकिशोरदासशास्त्री, जगन्नाथपुरीचे महंत गंगादास, भक्तिचरणदास तसेच बहिष्कृत केलेल्या खालशांचे महंत बृजमोहनदास, माधवाचार्य व रामदासत्यागी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी आखाडा व खालशांच्या महंतांनी आपापसातील वाद चव्हाट्यावर आणू नयेत, जे झाले ते झाले आता वाद होणार नाही, अशी भूमिका घेत हनुमानाचा जयघोष करीत वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले. काही चुकांमुळे गैरसमज होऊन वाद निर्माण झाले होते; मात्र यापुढे असे होणार नाही असे गंगादास यांनी सांगितले. वाद मिटविण्यासाठी सनकादिकाचार्य, माधोदास, रामभूषणदास, रामस्वरूपदास, लक्ष्मणदास, रघुवंशभूषण, गोकुळदास, गणेशदास, प्रभुदास, अखलेश्वर आदि महंतांची समिती स्थापन करण्यात आली होती. (वार्ताहर)