दिगंबर आखाड्याचे तीन खालसे बहिष्कृत
By Admin | Updated: August 23, 2015 23:43 IST2015-08-23T23:40:33+5:302015-08-23T23:43:00+5:30
ध्वजारोहण वाद : शाहीस्नानालाही मनाई करण्याचा पवित्रा

दिगंबर आखाड्याचे तीन खालसे बहिष्कृत
पंचवटी : साधुग्राममधील चतु:संप्रदाय आखाड्याच्या ध्वजारोहण सोहळ्यावर दिगंबर आखाड्याने बहिष्कार टाकूनही उपस्थित राहणाऱ्या तीन खालशांना मोठी किंमत चुकवावी लागली असून, त्यांना बहिष्कृत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेराहभाई महात्यागी, डाकोर खालसा आणि महात्यागी केंब खालसा या तिघा खालशांचा त्यात समावेश आहे.
रविवारी दिगंबर आखाड्याची बैठक होऊन महंत कृष्णदास, महंत वैष्णवदास, महंत रामकिशोरदास शास्त्री व दिगंबर आखाड्यांतर्गत येणाऱ्या ४५० खालशांच्या महंतांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. बहिष्कृत केलेले तीनही खालसे दिगंबर आखाड्याचेच असून, या खालशांना दिगंबर आखाड्याने शाहीस्नानाला सोबत नेण्याचा प्रयत्न केल्यास सुमारे ४५० खालसे येत्या शनिवारी (दि.२९) होणाऱ्या शाहीस्नानावर बहिष्कार टाकतील, असा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी साधुग्राममध्ये चतु:संप्रदाय आखाड्याचे ध्वजारोहण झाले. चतु:संप्रदाय आखाड्यावर दिगंबर आखाड्याचे वर्चस्व असल्याने दिगंबर आखाड्याच्या पंचरंगी ध्वजाचे इष्टदेवतेसमोर आरोहण करावे, अशी मागणी साधू-महंतांनी केली होती. परंतु चतु:संप्रदाय खालशाची ध्वजा लाल रंगाची असते, असे स्पष्ट करत लाल रंगाचा ध्वज फडकविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दिगंबर आखाडा व खालशांनी ध्वजारोहण सोहळ्यावर बहिष्कार टाकला. मात्र, या ध्वजारोहण सोहळ्याला तेराहभाई त्यागी खालशाचे मनमोहनदास, डाकोरचे माधवाचार्य व महात्यागी केंब खालशाचे सीतारामदास यांनी हजेरी लावून पंचरंगी ध्वज, दिगंबर आखाडा व साधू-महंतांचा अपमान केल्याने त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, खालशांच्या अध्यक्षांची निवड झालेली नसताना बर्फानीदादा हे स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून मिरवत असून, ते आखाड्यांच्या महंतांचा अपमान करत असल्याने त्यांचाही बैठकीत निषेध करण्यात आला.
आखाड्याने खालशांचे स्वयंघोषित अध्यक्ष बर्फानीदादा व बहिष्कृत केलेल्या तीन खालशांवर कारवाई न केल्यास पहिल्या शाहीस्नानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा दिगंबर आखाड्यांच्या ४५० खालशांनी घेतला आहे. बैठकीला बडा त्यागी भक्तमाळ आखाड्याचे माधवदास महाराज, पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास, भय्यादास महाराज, विश्वंभरदास, सरजूदास त्यागी आदिंसह खालशांचे साधू-महंत उपस्थित होते. (वार्ताहर)
दिगंबर आखाड्याच्या बैठकीत बोलताना माधवदास महाराज. समवेत भय्युजी महाराज, रामकिशोरदासशास्त्री, महंत कृष्णदास, वैष्णवदास, भक्तिचरणदास आदि.