नाशिक : महाकवी कालिदासांच्या विविध नाटकांतून प्रेमभावनेचे विविध कंगोरे अधोरेखित होतात़ त्यामध्ये पितृत्वभाव, विलाप, वियोग अशा भावना दिसून येतात़ त्यामुळेच महाकवी कालिदासांना शृंगाराचा राजा असे म्हटले जाते, असे प्रतिपादन संस्कृत विषयाच्या अभ्यासक प्रा़ लीना हुन्नरगीकर यांनी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात केले़
आषाढ महिन्यातील प्रथम दिवसाचे औचित्य साधून सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महाकवी कालिदास यांच्या नाटकातील प्रेमभावना या विषयावरील व्याख्यानात हुन्नरगीकर बोलत होत्या़ त्या पुढे म्हणाल्या की, कालिदासांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या पत्नीकडून त्यांचा अपमान झाला व ते देशभ्रमंतीसाठी निघून गेले़ पुढे त्यांनी महाकाव्य, खंडकाव्य, नाटके असे साहित्य आपल्या प्रतिभाशक्तीने लिहिली़महाकवी कालिदासांचे काव्य व नाटकातील प्रेमभाव हे केवळ स्त्री व पुरुष यांच्यापुरते मर्यादित नसून ते आई-वडिलांचे मुलांवरील प्रेम, पितृत्व, विलास, वियोग अशा भावनाही त्यांनी आपल्या काव्य व नाटकात मांडल्याचेही प्रा़ लीना हुन्नरगीकर यांनी सांगितले़ या व्याख्यानाप्रसंगी आनंद अत्रे यांनी ‘श्रीरंगा कमलकांता, हरीपदरा ते सोड’ ही नांदी सादर केली़यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे सुरेश गायधनी यांनी ‘गोमांतक’चे संपादक श्रीराम पंचिद्रे हे काही अपरिहार्य कारणास्तव येऊ न शकल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली़ यावेळी सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, साई आपटे, आशिष रानडे यांच्यासह श्रोते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)