गरजूंची भूक भागविण्याचा निर्धार
By Admin | Updated: July 21, 2014 00:41 IST2014-07-20T22:46:51+5:302014-07-21T00:41:04+5:30
गरजूंची भूक भागविण्याचा निर्धार

गरजूंची भूक भागविण्याचा निर्धार
नाशिक : जगभरातील देशांपैकी भारतात कुपोषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या बालकांची संख्या अधिक असून, देशातील महाराष्ट्र राज्य अव्वलस्थानी आहे. शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध मोठमोठ्या हॉटेल्समधून उरलेले अन्न संकलित करून अन्नाची होणारी नासाडी थांबवून आदिवासी गाव, पाड्यांवर तसेच दुर्गम भागातील गरजूंपर्यंत पोहचवून त्यांची भूक भागविण्याचा निर्धार शहरातील काही युवकांनी केला आहे.
शहरातील विविध हॉटेल्समध्ये मोठमोठे समारंभ पार पडतात. यावेळी मोठ्या प्रमाणात अन्न उरते. लॉन्स, मंगल कार्यालयांमध्ये अशीच काहीशी स्थिती थोड्याफार फरकाने पहावयास मिळते. यामुळे उरलेल्या अन्नाची नासाडी होते. शहरालगतचा गरजू घटक भुकेमुळे व्याकूळ होतो. आदिवासी दुर्गम भागात दिवसेंदिवस कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. सदर बाब लक्षात घेऊन महिनाभरापूर्वी स्थापन झालेल्या मयूर अलई फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. हॉटेल्स व मंगल कार्यालये आदि ठिकाणी उरलेल्या अन्नाचे योग्यरीत्या संकलन करून वातानुकूलित वाहनाद्वारे ते गरजू घटकांपर्यंत पोहचविणार असल्याची माहिती मयूर अलई यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. (प्रतिनिधी)