व्यसनाधिनता नष्ट करा
By Admin | Updated: September 26, 2016 23:34 IST2016-09-26T23:33:50+5:302016-09-26T23:34:23+5:30
विवेक घळसासी : साहित्य साधना मंडळाचे उद्घाटन

व्यसनाधिनता नष्ट करा
निफाड : श्री रामचंद्र प्रभूंची सर्वात मोठी ताकद म्हणजे सयंम आणि कर्तृत्व. आपल्यातील प्रत्येक जीव राम आहे असे समजून जीवनात संयम पाळा. एकादशीचा उपवास न करता त्या दिवशी मी टीव्ही पाहणार नाही. मी वाहन चालवणार नाही, मोबाइल वापरणार नाही अशा संकल्प केला तर तो उपवास होईल. सर्व साहित्यिक व कवींनी सांगितल्याप्रमाणे वृक्षांशी सुसंवाद साधा. सयंम, बंधन, मर्यादा या त्रिसूत्रीचा आधार घेऊन कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आपले जीवन देवाला समर्पित करायचे असेल, माता-पित्यांची स्वप्ने पूर्ण करायची असेल तर आपले चारित्र निष्पाप फुलासारखे कोमल असले पाहिजे. पार्ट्या, वाढदिवस यात सहभागी होऊ नका. व्यसनावर विजय मिळविण्याचा पुरुषार्थ करा. म्हणजे आपोआपच व्यसनमुक्त भारत जगाला वंदनीय ठरेल, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले.
निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालयात साहित्य साधना मंडळाचे उद्घाटक म्हणून घळसासी बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एम. चिंतामणी, प्रा. माधव खालकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर कुलकर्णी, माधव सुरवाडे, संजय पाटोळे, रामनाथ आहेर, सोमनाथ मत्सागर, अनंत ताजणे, विष्णू मत्सागर आदि उपस्थित होते.
साहित्य साधना मंडळाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले की, युवकांनी कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये. युवक हा धरणाच्या भिंतीसारखा आहे. त्यास तडा गेल्यासे धरण फुटते आणि न भरून निघणारे नुकसान होते. युवकांनी तारु ण्यात ऊर्जा मिळवावी तरच देशाची अधिक प्रगती होईल, असे मत यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ म्हणाले की, अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच जीवनाला शिस्त हवी. वाचनाचे व्यसन लावा. भारतातील श्रेष्ठ साधूसंत म्हणजे थोर शास्त्रज्ञच आहे. त्यांच्या ग्रंथांचे अध्ययन करा. माता-पित्यास आनंद होईल अशा कृती करा. उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघा. प्रभू रामचंद्राची भूमिका करून जीवन सुंदर बनवा. त्यासाठी चांगले वाचनाची सवय लावा, असे आवाहन रसाळ यांनी केले. यावेळी माधव खालकर, सुनीता उफाडे, अनिल दातार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)