दुधाच्या तुटवड्याने मिठाई घटली
By Admin | Updated: June 3, 2017 00:14 IST2017-06-03T00:02:18+5:302017-06-03T00:14:19+5:30
नाशिक : शेतकरी संपाचा परिणाम दुसऱ्या दिवशी जाणवण्यास सुरुवात झाली आहे.

दुधाच्या तुटवड्याने मिठाई घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकरी संपाचा परिणाम दुसऱ्या दिवशी जाणवण्यास सुरुवात झाली आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी बाजारात जाणारे दूध रस्त्यावर सोडल्याने बाजारात दुधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन दुधाचे टॅँकर तसेच कॅन्सही रिकाम्या केल्या आहेत. यामुळे बाजारात दूध पोहचू शकलेले नाही. त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने संपाची तीव्रता वाढली आहे. भाजीपाला पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे मार्केट कमिटी ओस पडलेली असताना दुधाच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम जाणवू लागला आहे. कालपर्यंत दुधाची अडचण निर्माण झाली नसली तरी आज काहीप्रमाणात तुटवडा जाणवल्याने मिठाईविक्रेत्यांनी सांगितले. बाजारात ५५ ते ६० रुपये लिटर दराने मिळणारे दूध आता ७० रुपयांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे रोजच्या दुधापेक्षा विक्रेत्यांनी कमी दूध खरेदी केले आहे. गुरुवारी काही प्रमाणात दुधाचा साठा करून ठेवण्यात आला होता, परंतु आज हा साठा कमी झाला असून, दुधाचे भाव वाढल्याने मिठाईविक्रेत्यांनी कमी प्रमाणात दुधाची मागणी नोंदवली, मात्र पुरेसा दूध उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
शहारातील काही विक्रेत्यांची स्वत:ची डेअरी आणि दुधाचा व्यवसाय असल्याने त्यांना फारशी अडचण आलेली नाही. मात्र ज्यांना बाहेरून दूध विकत घ्यावे लागत आहे, अशा विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. दुधाचे पदार्थ कमी प्रमाणात तयार करण्यात आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गुरुवारपासून तयार करण्यात आलेली मिठाईविक्रेत्यांकडे असली तरी मिठाईचे प्रमाण आता कमी करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसात नव्याने मिठाई बनविली जाण्याची शक्यता कमी असल्याचेही विक्रेत्यांचे म्हणणे आहे.