वर्षभरानंतरही वेतन कराराचे पैसे नाहीत
By Admin | Updated: May 22, 2014 00:20 IST2014-05-21T22:55:15+5:302014-05-22T00:20:43+5:30
२७ रोजी धरणे : बस कर्मचार्यांचे पुन्हा आंदोलन

वर्षभरानंतरही वेतन कराराचे पैसे नाहीत
२७ रोजी धरणे : बस कर्मचार्यांचे पुन्हा आंदोलन
नाशिक : वेतनवाढ जाहीर झाल्यापासून एक वर्ष होत आले असतानाही वाढीव रक्कम न दिल्याने तसेच विविध मागण्यांसाठी परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी पुन्हा राज्यस्तरीय आंदोलनाचा निर्णय घेतल्याने शहरातील वाहतूक पुन्हा प्रभावित होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दोनदिवसीय आंदोलनात प्रथम दि. २७ रोजी विभागीय कार्यालय, मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात येणार आहेत. वेतन कराराच्या मागण्या आणि बैठकातील निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठीच्या उपायांचीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष असून, त्याविरोधातच हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिली.
याबरोबरच वेतनकरारास एक वर्ष होऊनही वाढीव वेतनाच्या थकबाकीची रक्कम न देणे, १० टक्के महागाई भत्ता देणे, एक दिवसाचे आंदोलन केल्यास कर्मचार्यांच्या वेतनातून आठ दिवसांचे वेतन वसूल करणे, अवैध खासगी वाहतुकीवर सक्षम नियंत्रण नसणे यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
याशिवाय शासकीय स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ४ जून रोजी आझाद मैदान, मुंबई येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. या दोन्ही आंदोलनांसाठी संघटनेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने या दोन्ही दिवशी प्रवासी वाहतूक प्रभावित होऊ शकते. कामगारांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण आणि हनुमंत ताटे यांनी कळविले आहे.
शासन, प्रशासनच जबाबदार
शासनाकडे महामंडळास देय असलेले १८४० कोटी रुपये अद्याप बाकी आहेत. याशिवाय इतर राज्यांप्रमाणे राज्य शासन महामंडळाला आर्थिक मदतही देत नाही याची कल्पना शासनाला दिलेली आहे. त्यामुळे दोन्ही दिवशी वाहतूक प्रभावित झाली आणि प्रवाशांना त्रास झाला तर त्याची जबाबदारी शासन आणि महामंडळ प्रशासनावर असेल.
- प्रमोद भालेकर (पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट कामगार संघटना)