येवला : तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील व अनु.जाती-जमातीच्या निवडक लाभार्थींची प्रकरणे मंजूर होऊनही निवड झालेल्या २२ लाभार्थींना अद्याप संकरित गायीचे वाटप झाले नाही, अशी तक्रार सायगाव, महालखेडासह ग्रामस्थांनी केली आहे.शासनाच्या वतीने अनु. जाती-जमाती तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, पशुधन वाढावे, दुग्धव्यवसाय वाढावा म्हणून विशेष घटक योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थींस ५० टक्के अनुदानावर सहा संकरित गायींचा गट घेऊन देण्याची योजना आहे. या योजनेसाठी येवला तालुक्यातील २२ लाभार्थींनी ५० टक्के रक्कम म्हणजेच एक लाख ७३ हजार रुपये, पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात सहा महिन्यांपूर्वी जमा केले आहे.सायगाव, महालखेडा, नांदूर, गारखेडा, अंगुलगाव यासह अनेक गावांच्या लाभार्थींनी येवला पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात अनेक वेळा वारंवार चकरा मारूनही संबंधित अधिकार्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. लाभार्थींनी ५० टक्के अनुदानाची रक्कम भरल्यानंतर एका महिन्याच्या आत संकरित गायी घेऊन देणे बंधनकारक असतानाही तसे घडले नाही.संबंधित पशुसंवर्धन अधिकारी वेळकाढूपणाची भूमिका घेतात. वरिष्ठ कार्यालयाने या प्रकरणी लक्ष घालून त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाकडून सदरची रक्कम सुमारे ५२ लाख रुपये येवला पशुसंवर्धन तालुका अधिकारी यांच्याकडे वर्ग झाल्याचे समजते. परंतु एवढी मोठी रक्कम असल्याकारणाने, खरेदीचा व्यवहार गटविकास अधिकारी यांच्यामार्फत व्हावा व लाभार्थी लाभ द्यावा, असे पशुसंवर्धन अधिकारी यांचे म्हणणे असल्याचे समजते. परंतु, गटविकास अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्या तू तू मै मैमध्ये लाभार्थी मात्र योजनेपासून वंचित राहत आहे.
शासनाकडून प्रकरणे मंजूर होऊनही येवल्यातील लाभार्थी वंचित
By admin | Updated: May 9, 2014 22:54 IST