आरक्षणामुळे इच्छुकांचा हिरमोड
By Admin | Updated: January 10, 2017 00:35 IST2017-01-10T00:35:40+5:302017-01-10T00:35:54+5:30
वीरगाव गटात रस्सीखेच : सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपा महिला उमेदवाराच्या शोधात

आरक्षणामुळे इच्छुकांचा हिरमोड
नितीन बोरसे सटाणा
बागलाण तालुक्यातील वीरगाव गटावर निर्मितीपासूनच कॉँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या गटात पक्षापेक्षा व्यक्तीभोवतीच राजकारण फिरत असल्याचे अनुभवायला आले आहे. या गटात समाविष्ट गावे दहा वर्षांपूर्वी कळवण मतदारसंघातील असल्यामुळे साहजिकच या गटावर माजी मंत्री ए. टी. पवार यांचे प्राबल्य आहे. यंदा हा गट अनुसूचित जमाती महिला राखीव झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला असून, कॉँग्रेसच्या ताब्यातील हा गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी या राजकीय दंगलीत विजयश्री खेचून आणणाऱ्या सक्षम महिला उमेदवाराच्या शोधात भाजपा दिसून येत आहे.
वीरगाव गटाची दहा वर्षांपूर्वी गट पुनर्रचनेत निर्मिती झाली. यापूर्वी हा गट डांगसौंदाणे गटात समाविष्ट होता. माजी मंत्री कै. डॉ. दौलतराव अहेर व माजी मंत्री ए. टी. पवार हे दोन्ही प्रभावी नेते तत्कालीन युती सरकारच्या मंत्रिमंडळात होते. त्याच काळात मविप्र आणि वसाका या मोठ्या संस्थादेखील कै. डॉ. अहेर यांच्या ताब्यात होत्या. वसाकाच्या माध्यमातून ऊस परिषद असो वा निवडणूक असो, या भागात दांडगा संपर्क असल्यामुळे साहजिकच डॉ. अहेर यांचा या भागावर मोठा प्रभाव होता. डॉ. अहेर यांच्या वर्चस्वामुळे कुमोदिनी महाले, नारायण साबळे यांच्या माध्यमातून भाजपाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. गट पुनर्रचनेत वीरगाव गटाची नव्याने निर्मिती होऊन हा गट सर्वसाधारण महिला आरक्षित करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती यशवंत पाटील यांच्या पत्नी काँग्रेसच्या संगीता पाटील व प्रा. अनिल पाटील यांच्या मातोश्री व राष्ट्रवादीच्या उमेदवार मीराबाई पाटील यांच्यात चुरशीची लढत रंगली होती. संगीता पाटील विजयी झाल्याने मीराबाई पाटील यांना होमग्राउण्डवर पराभव पत्करावा लागला होता. युतीच्या उमेदवाराला मात्र तिसऱ्या क्र मांकावर समाधान मानावे लागले होते. गेल्या निवडणुकीत आरक्षण सोडतीत हा गट ओबीसी प्रवर्गातील पुरुष राखीव झाला. त्यामुळे साहजिकच इच्छुकांची संख्यादेखील वाढली. प्रा. अनिल पाटील यांच्या मातोश्री थोड्या फरकाने पराभूत झाल्यामुळे पाटील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय धर्मराज खैरनार यांना पक्षाने तिकीट दिल्यामुळे ऐनवेळी प्रा. पाटील यांना पक्षांतर करून काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात उतरावे लागले.