वाळविहीर ग्रामपंचायतने सुरू केली पीठगिरणी
By Admin | Updated: February 5, 2017 00:11 IST2017-02-05T00:11:31+5:302017-02-05T00:11:43+5:30
अभिनव संकल्पना : नियमित कर भरणाऱ्यांना मिळणार तीस किलो दळण मोफत दळून

वाळविहीर ग्रामपंचायतने सुरू केली पीठगिरणी
सुनील शिंदे घोटी
इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरात असलेल्या वाळविहीर परिसरात धान्य दळण्यासाठी, भात भरडण्यासाठी गिरणी नसल्याने येथील ग्रामपंचायतने अभिनव उपक्र म राबवत गावातच गिरणी टाकून ग्रामस्थांचा वेळ, श्रम व पैसे वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. नियमितपणे ग्रामपंचायत कर भरणाऱ्या ग्रामस्थांना धान्य दळण व भात भरडण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने कूपन वाटप करण्यात आले असून, यात महिन्याला तीस किलो धान्य विनामूल्य दळून दिले जाणार असल्याने ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याने विक्र मी कर गोळा झाला आहे. घोटी - वैतरणा रस्त्यावरील वाळविहीर हे छोटेसे गाव. या गावाच्या तब्बल बारा वाड्या इतरत्र विखुरल्या गेल्या आहेत. भात या प्रमुख पिकासह कडधान्य मोठ्या प्रमाणात पिकविले जाते. मात्र हे धान्य भरडण्यासाठी परिसरात एकही गिरणी नसल्याने या गावातील नागरिकांना धान्य दळण व भात भरडण्यासाठी घोटीशिवाय पर्याय नव्हता. मात्र येथील सर्वसामान्य जनतेचे होणारे हाल लक्षात घेऊन येथील ग्रामसेवक प्रमोद ठाकरे यांनी ग्रामपंचायतमार्फत गावातच गिरणी टाकण्याची संकल्पना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. यात सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत या संकल्पनेला ग्रामसेवक ठाकरे यांनी मूर्त स्वरूप देत मारु तीवाडी येथे ही गिरणी सुरूही केली. ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू केलेल्या या गिरणीत धान्य दळण करण्यासाठी तसेच भात भरडण्यासाठी ग्रामपंचायतकडून कूपन उपलब्ध करून देण्यात आली असून, यानुसार ग्रामपंचायत कर भरणाऱ्या ग्रामस्थाला तीस किलो धान्य मोफत दळून दिले जाणार आहे, तर त्यापुढे सवलतीच्या दरात धान्य, भात, मसाला दळून दिला जाणार आहे. यामुळे गावातच सोय उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांची या उपक्र माला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने ग्रामपंचायतच्या करात लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, ही सवलत लगतच्या भावली व पिंपळगाव भटाटा या गावलाही देण्यात येणार आहे.