शासकीय योजनांपासून खरे अपंग वंचित
By Admin | Updated: June 12, 2014 00:45 IST2014-06-12T00:36:04+5:302014-06-12T00:45:08+5:30
नामपूर : अपंग व्यक्ती शासनाच्या सवलतींपासून वंचित आहेत तर खोटे अपंगत्वाचे दाखले घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे

शासकीय योजनांपासून खरे अपंग वंचित
नामपूर : जिल्ह्यात बोगस अपंग कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. खऱ्या अपंग व्यक्ती शासनाच्या सवलतींपासून वंचित आहेत तर खोटे अपंगत्वाचे दाखले घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याबाबत चौकशी होऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
अपंग कर्मचाऱ्यांची तपासणी त्रिसदसीय बोर्डाकडून होऊन त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळते. मात्र येथेही पैसा व वशिल्याच्या जोरावर अपंग नसणाऱ्यांना ही प्रमाणपत्रे मिळाली असून, बऱ्याच कर्मचाऱ्यांनी हुद्याच्या बढत्याही घेतल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बदलांमध्ये सवलतीही घेत आहेत. यामुळे खरे अपंग या सवलतींपासून वंचित राहत आहेत. खरे अपंगत्व सिद्ध करणारे मेडिकल बोर्डाचे प्रमाणपत्र असते व ते आॅनलाइन असते मात्र हे प्रमाणपत्र घेणारे आरोग्य खात्यात केवळ निकम (देवळा),अब्बू शेख (सुरगाणा) हे दोघेच आहेत. इतर अनेकांनी त्रिसदस्यीय समितीच्या प्रमाणपत्रावर या सवलती भोगत आहेत. मलेरिया संघटनेचे विलास शेलार व इतरांनी माहितीच्या अधिकारात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपंगत्वाचे लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे व संख्या यांची माहिती मागविलेली असून, या प्रश्नावर नाशिक जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटना, शिक्षण संघटना या सर्व संघटना एकत्रितपणे खऱ्या अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. या महिन्यात झालेल्या बदल्यांमध्ये अनेक बोगस प्रमाणपत्र धारण केलेल्या कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला असून, केवळ अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे म्हणून अनेक बोगस अपंग कर्मचारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत. त्यांचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजू बैरागी, भट शिंदे, तात्यासाहेब पवार, मलेरिया संघटनेचे विलास शेलार आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)