देवळा तालुका दुष्काळी जाहीर करा
By Admin | Updated: July 23, 2014 00:32 IST2014-07-22T22:05:42+5:302014-07-23T00:32:31+5:30
मागणी : पाटबंधारे विभागाची स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय

देवळा तालुका दुष्काळी जाहीर करा
देवळा : टंचाई आढावा बैठकीत देवळा तालुक्यात दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली. चणकापूर उजव्या कालव्याची वहनक्षमता व या कालव्याच्या इतर प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी पाटबंधारे विभागाची स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या होत असलेल्या वाळू उपशाबद्दल यावेळी तक्रारी करण्यात येऊन प्रशासनाच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
देवळा येथे आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गत दीड महिन्यांपासून देवळा तालुक्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंतित झाले आहेत. अनेक गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु तो पुरेसा नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आल्याने लोकसंख्येच्या प्रमाणानुसार टँकरची मागणी पूर्ण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. गिरणा नदीपात्रात ब्रिटिशकालीन बंधारे किंवा केटीवेअर बंधारे बांधण्यात आले तर पाणी अडविले जाईल व नदीला पाणी नसतानादेखील पाणीपुरवठा योजना सुरळीत राहतील यासाठी गिरणा नदीपात्रात केटीवेअर बंधारे बांधण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य उषाताई बच्छाव यांनी केली.
गिरणा नदीपात्रात अवैधरीत्या होत असलेल्या वाळू उपशाबाबत तहसीलदार श्रीमती भोसले यांच्याकडे तक्रार करूनही त्या कोणतीही दखल घेत नाहीत. यामुळे वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याची तक्रार लोहोणेरच्या सरपंच सुलोचना शेवळे यांनी केली. चणकापूर उजव्या कालव्याची वहनक्षमता कालव्याच्या सुरुवातीस १८४.१९ क्युसेक्स इतकी असूनही कालव्याला १०० ते ११० क्युसेक्स इतकेच पाणी असल्याने देवळा तालुक्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही रामेश्वर धरण कालव्याद्वारे भरण्यास दोन आठवडे लागणे अपेक्षित असताना दीड महिना लागतो. सदोष कामाची चौकशी करण्याची मागणी विजय पगार यांनी केली असता या विषयाबाबत पाटबंधारे विभागाची स्वतंत्र बैठक आमदारांसोबत घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. देवळा येथील मुद्रांकविक्रेते मनमानी करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली अशा मुद्रांक विक्रेत्यांना निलंबित करण्याणे आदेश आमदार कोतवालांनी महसूल विभागाला दिले.
तालुक्यात गारपीटग्रस्तांचे
पंचनामे चुकीच्या पद्धतीने झाल्याने उमराणे, तीसगाव, वऱ्हाळे येथील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. तालुका कृषी अधिकारी संजय
गुंजाळ यांनी चिंचवेतील शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दडपण आणल्याचा आरोप केल्याने तणाव निर्माण
झाला. तालुक्यात ४६ पदवीधरांची
पदे मंजूर असून, १५ पदे भरण्यात
आली असून, ३१ पदे रिक्त असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारीपारधी यांनी दिली. (वार्ताहर)