डेंग्यूचे पुन्हा संकट
By Admin | Updated: June 15, 2016 00:18 IST2016-06-14T22:38:32+5:302016-06-15T00:18:31+5:30
रुग्णसंख्येत वाढ : सिडको, सातपूर परिसरात सतर्कता

डेंग्यूचे पुन्हा संकट
नाशिक : शहरात डेंग्यूच्या आजाराने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने महापालिकेचा आरोग्य व वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. गेल्या दहा दिवसांत ३१ रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यातील प्राप्त नमुन्यांमध्ये ११ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रामुख्याने, सिडको-सातपूर व वडाळागाव परिसरात डेंग्यूचे संकट अधिक असून, पालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, पावसाळ्यात होणाऱ्या आजारांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय विभागाने मनपाच्या सर्व रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांत सज्जता ठेवली असून, सहाही विभागात फिरते दवाखाने कार्यान्वित केले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शहरात डेंग्यूच्या आजाराने नाशिककरांची पाठ सोडलेली नाही. २०१४ मध्ये डेंग्यूच्या आजाराची भयावहता जास्त होती. त्यानंतर मागील वर्षी सिंहस्थ पर्वणीकाळापूर्वीही डेंग्यूचा प्रभाव कायम होता. दरम्यान, यंदाही डेंग्यूचा प्रभाव कमी-अधिक प्रमाणात कायम आहे. मे महिन्यात शहरात डेंग्यूची लागण झालेले ३५ रुग्ण आढळून आले होते. आता गेल्या १० दिवसांत ११ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेने ३१ संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील २२ रुग्णांचे नमुने प्राप्त झाले आहेत. सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत नाहीत; परंतु गेल्या दोन-तीन महिन्यांत डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. महापालिकेकडून एकवेळ पाणीपुरवठ्याबरोबरच दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याने नागरिकांकडून पाण्याची साठवणूक केली जात आहे. मात्र, जास्त दिवस पाणी साठवून ठेवले जात असल्याने स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या ‘एडिस’ डासांची उत्पत्ती होत आहे. शहरातील सिडको, सातपूर, अशोकनगर तसेच वडाळागाव आणि जुने नाशिकमधील काही भागात डेंग्यूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने डेंग्यूच्या अळ्यांची शोध मोहीम राबवित पाण्याने भरलेले कंटेनर खाली करून दिले जात आहेत. याशिवाय, नागरिकांचेही प्रबोधन केले जात असून, जास्त काळ पाणी साठवून ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, पावसाळ्यात होणाऱ्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेने सहाही विभागात आरोग्य व वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवली आहे. महापालिकेची चारही रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय सहाही विभागात फिरते दवाखाने कार्यान्वित केली असून, त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, वॉर्डबॉय व चालक यांचे पथक तैनात ठेवण्यात आले आहे. आपत्कालीन स्थितीतही मनपाची सर्व रुग्णालये सज्ज असतील, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी सांगितले.