नाशिक : आदिवासींना त्यांच्या वन हक्काचा सातबारा उतारा मिळण्याच्या मागणीसाठी शनिवारी राज्य किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून मागण्यांचे निवेदन सादर केले. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वन कायद्याप्रमाणे आदिवासींनी वन दावे दाखल केलेले आहेत व त्या सोबत पुरावेही जोडले आहेत. परंतु अद्यापही वनजमीन नावावर झालेली नाही. सध्या कसत असलेली वनजमीन आमच्या ताब्यात असतानाही वन अधिकारी चुकीची माहिती देत हक्क नाकारत आहे त्यामुळे वन अधिकारी, महसूल अधिकारी व वन हक्क कमिटी यांनी संयुक्तपणे पाहणी करावी, त्याचबरोबर शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या वाढत आहेत ते रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅँकेत मुबलक पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात कॉ. राजू देसले, भास्करराव शिंदे, देवीदास भोपळे, नामदेव राक्षे, प्रकाश भावसार, संजय बैरागी, किरण डावखर, संजय पवार, आदि सहभागी झाले होते.
किसान सभेची निदर्शने
By admin | Updated: December 31, 2016 23:27 IST