आरक्षणासाठी तिसऱ्या सूचीची मागणी करा
By Admin | Updated: August 2, 2014 01:26 IST2014-08-01T22:47:13+5:302014-08-02T01:26:20+5:30
शिवाजीराव मोघे : सनदशीर मार्गाने लढा गरजेचा

आरक्षणासाठी तिसऱ्या सूचीची मागणी करा
आरक्षणासाठी तिसऱ्या सूचीची मागणी करा
शिवाजीराव मोघे : सनदशीर मार्गाने लढा गरजेचानाशिक : आंदोलने करून आरक्षण मिळत नाही; त्याला सनदशीर मार्गानेच लढा द्यावा लागतो, असा अप्रत्यक्ष सल्ला सामाजिक न्याय व इतर मागासवर्गीय कल्याणमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिला. आरक्षण मिळविण्यासाठी तिसऱ्या सूचीची मागणी करण्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, विविध महामंडळांच्या निधीत आम्ही गेल्या दोन वर्षांत मोठी वाढ केली आहे. अण्णा भाऊ साठे महामंडळाला ७५ कोटी रुपयांचे वाढीव भांडवल, रोहिदास महामंडळाला ७५ कोटी आणि महात्मा फुले महामंडळाला १५० कोटी रुपयांचे वाढीव भागभांडवल देण्यात आल्याचे ते म्हणाले. अपंग महामंडळाला शासनानेही मोठी गॅरंटी दिली असल्याने कर्जेही मोठ्या प्रमाणात देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
शिष्यवृत्ती योजनांमध्ये होत असलेल्या गोंधळांबाबत माहिती मिळाल्यानंतर सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्या आम्ही आॅनलाइन केल्या असून, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसल्याचे दिसते आहे. सहा प्रकारच्या आॅनलाइन शिष्यवृत्त्यांमधून सुमारे ३२ लाख ३६ विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत असल्याचे मोघे म्हणाले. याशिवाय इतरही समाजाच्या लाभार्थींना थेट लाभ मिळतील अशी योजना असल्याचे ते म्हणाले. जादूटोणाविरोधी विधेयकाबाबत बोलताना ते म्हणाले, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी असलेला विरोध आता कमी झाला आहे. सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या मागणीबाबत ते म्हणाले की, केवळ आंदोलने करून आरक्षण मिळत नाही अथवा अनुसूचित जमातीत समावेश होत नाही. त्यासाठी सनदशीर मार्गाने लढा द्यावा लागतो. आदिवासी समाजात समावेश व्हावा अशी जर मागणी असेल, तर त्यासाठी आधी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यानंतर केंद्र सरकार आदिवासी संशोधन संस्थेला त्याबाबत माहिती देऊन संशोधन करायला सांगते. राज्य सरकारच्या अखत्यारित एक समिती नेमली जाते. त्यात आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी आणि आणखी काही सदस्यांचा समावेश असतो. त्या सर्वांच्या शिफारशीनंतर आदिवासी जमातीत समावेश होऊ शकतो. अनेक जमातींचे असे दावे फोल ठरले आहेत. त्यामुळे आरक्षणाचे फायदे मिळवायचे असतील तर तिसऱ्या सूचीची मागणी करा आणि त्यात समाविष्ट व्हा, असा सल्लाही त्यांनी दिला.