सेवाकुंज येथे भुयारी मार्गाची मागणी
By Admin | Updated: October 21, 2015 22:10 IST2015-10-21T22:09:53+5:302015-10-21T22:10:41+5:30
सेवाकुंज येथे भुयारी मार्गाची मागणी

सेवाकुंज येथे भुयारी मार्गाची मागणी
पंचवटी : सेवाकुंज परिसरात अनेक शाळा असून, वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने सेवाकुंज परिसरात लक्ष वेधून ‘भुयारी मार्ग’ तयार करावा, अशी मागणी नागरिक व विद्यार्थी पालकांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी शहर बसने आजी व दोघा नातवंडांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेत अडीच वर्षीय रोनितचा बळी गेला होता, तर त्याची आजी संगीता चौहान ही गंभीर जखमी झाली होती. ही घटना घडल्याने शेकडो नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत अपघातग्रस्त बसवर दगडफेक केल्याची घटना घडली होती. भुयारीमार्ग, तसेच वाहतूक पोलिसांची वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रोनितचा बळी गेल्याची घटना घडल्याचे सांगून नागरिकांनी प्रशासनावर तोफ डागली होती.
काही वर्षांपूर्वी अशाचप्रकारे बसखाली दोघे विद्यार्थी ठार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरातील आर. पी. विद्यालय, श्रीराम विद्यालय, पंचवटी एज्युकेशन संस्था तसेच स्थानिक नागरिकांनी वर्षानुवर्षे मनपा व पोलीस प्रशासनाकडे भुयारी मार्ग करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती; परंतु प्रशासनाने त्याची आजपावेतो दखल घेतलेली नाही. सेवाकुंज परिसरातील शाळा व दररोज रस्ता ओलांडणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने आता तरी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भुयारी मार्ग बनविण्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. अशी मागणी नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)