ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST2021-04-30T04:19:29+5:302021-04-30T04:19:29+5:30
नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनअभावी रुग्णालयांकडून रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नसल्याचे प्रकार घडत ...

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनअभावी रुग्णालयांकडून रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नसल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
--
खाद्यतेल महागले, सामान्यांचे बजेट कोलमडले
नाशिक : खाद्यतेलाच्या किमती महागल्याने सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. सध्या खाद्यतेल दीडशे ते १९० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचल्याने सामान्य कुटुंबांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
--
कोरोना रुग्णावर डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार
नाशिक : शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक नातेवाईक रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार करीत आहेत. परंतु, असे करताना रुग्णांना तपासणीसाठी नेताना आणताना नातेवाईक रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने त्यांनाही कोरोनाची बाधा होण्याचा धोका वाढला आहे.
--
शेतकऱ्यांकडून कांद्याची हातविक्री
नाशिक : कोरोनामुळे कांदा व्यापार थंडावला असून कांद्याचे भावही सातत्याने घसरू लागले आहे. त्यामुळे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शहरातील विविध भागांत वाहनांमधून अथवा भाजीबाजारात हातविक्रीने कांद्याची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळत असले तरी मोठ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची काद्याचे भाव घसरल्याने अडचण झाली आहे.
---
कोरोना चाचण्या वाढविण्याची मागणी
नाशिक : वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या कोरोना चाचण्या वाढविण्याची मागणी आरोग्यक्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्थांनी केली आहे. अनेक रुग्णांमध्ये कोरानाची लक्षणे नसल्याने ते खुलेआम फिरत असून कोरोनाच्या प्रसारास कारणीभूत ठरत आहेत. अशा नागरिकांच्या चाचण्या करून बाधित रुग्णांच्या विलगीकरणाची सोय करण्याची मागणीही सामाजिक संस्थांकडून होत आहे.
---
शहरातील रस्त्यांवर गर्दी कायम
नाशिक : शहरातील बाजारपेठा बंद असल्या तरी रस्त्यावरील गर्दी मात्र कायम आहे. अनेक नागरिक कोरोनाच्या संकटातही घराबाहेर पडत असून काही नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालनही होत नाही. त्यामुळे अशाप्रकारे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थांकडून होत आहे.