वडाळागाव : येथील डीजीपीनगर क्रमांक-१ ते साईनाथनगरला जाणार्या सावता माळी कॅनॉल रस्त्यावरील अवजड वाहतूक थांबविण्याची मागणी होत आहे. वडाळागावमार्गे डीजीपीनगरला जाणार्या रस्त्यावर अवजड वाहतूक सर्रासपणे सुरू असल्यामुळे रस्त्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. आंबेडकरनगर कॉर्नरपासून डावीकडे वळण घेत पुणे महामार्गावरील वाहने वडाळा-डीजीपीनगर रस्त्याने धावतात. हा रस्ता दिवसेंदिवस धोकेदायक बनत चालला आहे. या रस्त्यावरून अवजड वाहतुकीला बंदी असूनदेखील वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत भरधाव वेगाने वाहने धावत असल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.वडाळा-डीजीपीनगर-साईनाथनगर रस्त्याला ठिकठिकाणी धोकेदायक वळणे असल्यामुळे वाहने समोरासमोर येऊन अपघाताची शक्यता अधिक बळावते, तसेच सदर रस्त्याला विविध कॉलन्यांमधील जोडरस्ते मिळत असल्यामुळे रस्ता ओलांडताना उपनगरीय वसाहतींमधील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.
अवजड वाहतूक थांबवण्याची मागणी
By admin | Updated: May 17, 2014 00:20 IST