मालेगावी मोतीबाग भागातील नागरी समस्या सोडविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:56+5:302021-09-26T04:15:56+5:30
शहरातील त्रिरत्न नगर, मोती नगर, रामनगर, तुळसाई नगर, नालंदा नगर, राजे संभाजी नगर, वाल्मीकी नगर, भिमनगर, जागृतीनगर या ...

मालेगावी मोतीबाग भागातील नागरी समस्या सोडविण्याची मागणी
शहरातील त्रिरत्न नगर, मोती नगर, रामनगर, तुळसाई नगर, नालंदा नगर, राजे संभाजी नगर, वाल्मीकी नगर, भिमनगर, जागृतीनगर या भागातील पथदीप बंद आहेत. संबंधित परिसरामध्ये सुमारे १५ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. विद्युत पथदीप व विद्युत संबंधित समस्या गंभीर आहेत.
गेल्या अनेक महिन्यापासून, विद्युत विभागातील संबंधित अधिकारी, ठेकेदार व कर्मचारी यांना प्रत्यक्ष व फोनद्वारे येथील समस्यांबाबत वारंवार माहिती देऊन देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.
मनपातर्फे काही भागांमध्ये नवीन पद्धतीने एल.ई.डी स्ट्रिट लाईट लावण्यात आले आहेत. परंतु या परिसरात असलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांच्या दारासमोर बऱ्याच ठिकाणी अनेक वर्षापासून अद्याप अंधार आहे.
येथील मोतीनगर, हनुमान मंदिरालगत असलेल्या लोखंडी विद्युत खांब पावसाच्या पाण्यामुळे गंज लागून सडलेला आहे. हा खांब पडल्यास जीवित किंवा वित्त हानी होऊ शकते. या भागातील पथदीप चेंजर कित्येक महिन्यापासून खराब झाल्यामुळे वायरी खुल्या आहेत.
पाऊस वाऱ्यामुळे वारंवार रात्री बेरात्रीच्या वेळेस लाईट बंद पडतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी चोऱ्या वाढल्या आहेत.
पाण्याची टाकी लगत असलेला फ्युज कायमस्वरुपी पर्याय व्यवस्था करावी, पथदीप नसलेल्या जागेवर नवीन पध्दतीच्या एल.ई.डी.दिवे लावावे, परिसरातील बंद पडलेले पथदीप दुरुस्त करावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
बहुजन समाज पक्षाचे शहराध्यक्ष सुनील पवार, मोहन बागुल, देवीदास सुरंजे, अमोल निकम, बुद्धभूषण निकम, शेखर आहिरे, नाना महाले, विजय मगरे, सागर निकम, रोहित आहिरे, अनिल दाभाडे, अनिल पवार, मयूर निकम निवेदनावर यांच्या सह्या आहेत.